सरकारचा लज्जास्पद निर्णय – इम्तियाज जलील
Finally my stand has been proved right by not allowing liquor shops to open in aurangabad.Mumbai now has realised what I had realised before only.Don’t know how much more damage has been caused in these 2 days when we saw mockery of social distancing at liquor shops across state!
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) May 5, 2020
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील वाइन शॉप उघडण्यास सरकारने परवानगी दिल्याने ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. ‘दारू खरेदी करण्याएवढा पैसा ज्यांच्याकडे आहे ते अन्नधान्यही नक्कीच खरेदी करू शकतात. त्यामुळे वाइन शॉप सुरू होताच दारूच्या दुकानांसमोर रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा,’ अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पुकारण्यात आलेला लॉकडाऊन तिसऱ्या टप्प्यात काहीसा शिथिल करण्यात आला. दरम्यान, राज्यातील वाइन शॉप उघडण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. ही परवानगी दिल्यानंतर ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. मद्यपींनी दुकानांसमोर प्रचंड गर्दी केल्याने संसर्गाचा धोका वाढला. शिवाय, पोलीस यंत्रणेवरचा ताण ही वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमने सरकारच्या या निर्णयावर सडकून टीका केली. सरकारचा हा निर्णय लज्जास्पद आहे, असे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘उद्धव ठाकरे यांच्या चांगल्या कामाचे आम्ही देखील कौतुक करत होतो. पण आता ते सगळं व्यर्थ गेलं आहे. औरंगाबादमध्ये एकही दुकान आम्ही उघडू दिले नाही. मग रेड झोनमधील इतर आमदार, खासदार या मृत्यूच्या खेळाला का आमंत्रण देत आहेत. कदाचित ते देखील ‘बेवडे’ असावेत,’ असा संताप इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा वाइन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटी आमची भूमिका योग्य ठरली. मात्र, दोन दिवसात आरोग्याच्या दृष्टीने नेमके किती नुकसान झाले असेल माहीत नाही,’ अशी चिंताही इम्तियाज जलील यांनी ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.