भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, अनेक जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील नरपोली परिसरात शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. भंडारी कंपाउंडमधील चार मजली ‘कोहिनूर बिल्डिंग’ अचानक कोसळल्याने आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 8 ते 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथके ढिगारा हटवून अडकलेल्यांचा शोध घेत आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिकेने इमारत आधीच धोकादायक घोषित केली होती
या दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी महानगरपालिकेने यापूर्वीच या इमारतीचे सर्वेक्षण करून तिला ‘सी’ श्रेणीतील अत्यंत धोकादायक आणि जीर्ण इमारत घोषित केले होते.
महापालिकेने इमारत रिकामी करण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार बहुतेक रहिवाशांनी इमारत सोडली होती.
दुरुस्तीचे काम सुरू असतानाच दुर्घटना
प्राथमिक माहितीनुसार, इमारत रिकामी असली तरी तळमजल्यावर एका कुटुंबाकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी काही मजूरही काम करत होते. याच दरम्यान इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळला आणि मजूर तसेच काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले.
प्रशासनाने यापूर्वी चार वेळा सुरक्षा नोटिसा बजावल्या होत्या, तरीही दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
निष्काळजीपणाबाबत प्रश्नचिन्ह
इमारत अधिकृतपणे धोकादायक घोषित झाल्यानंतरही तेथे दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यास परवानगी कशी मिळाली? परिसर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची होती? अशा अनेक प्रश्नांवर आता चर्चा सुरू झाली आहे.
प्रशासनाने परिसराला सुरक्षा घेरा घातला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि बचावकार्यात अडथळा आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू असून संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
