Weather news update : महाराष्ट्र आज कमालीचा तापणार , औरंगाबादचा पारा आज ४३ वर तर दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता …
मुंबई: राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी उन्हात बाहेर जाणे टाळावे . तसेच योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे . महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांमध्ये तापमान ४० अंशांच्या वर गेलं आहे. मुंबई आणि नाशिक मध्ये उष्णतेची लाट असल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. कडाक्याचे ऊन असताना राज्यातील काही ठिकाणी वातावरणात दुपारनंतर मोठे बदल झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मराठवाड्यात मात्र उष्णतेची तीव्रता वाढली असून उद्या १८ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 43 अंशांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाड्यामध्ये देखील उष्णतेची तीव्रता सातत्याने वाढत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १७ एप्रिल रोजी ४१ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. यात दोन अंशांनी वाढ होऊन ते १८ एप्रिलला ४३ राहण्याची शक्यता आहे. तसेचऔरंगाबादमध्ये बुधवारी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर १९ तारखेला देखील मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
दरम्यान राज्याची राजधानी मुंबईमध्ये तापमान ३७ अंशांच्या वर गेल्यानंतर हिट वेव्ह घोषित केली जाते. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील तापमान ३९ आणि ३८ अंश नोंदवले गेले . तर १७ एप्रिल रोजी ३७ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे मागील तीन दिवस मुंबईमध्ये हिट वेव्ह असल्याचे चित्र आहे. यानंतर मात्र मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळणार असून तापमानात हळूहळू घट होण्यास सुरुवात होणार आहे.
पुणे शहरात यंदाचा उन्हाळा हा सर्वाधिक उष्ण असल्याचे पाहायला मिळतेय. १७ एप्रिल रोजी पुण्यामध्ये ४१ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. दुपारनंतर पुण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर उद्या १८ एप्रिल रोजी देखील पुण्यातील कमाल तापमान हे ४१ अंश सेल्सिअस एवढे असणार आहे.
दरम्यान अवकाळी पावसाचे सावट काही प्रमाणात कमी झाल्यानंतर विदर्भात पुन्हा तापमानात वाढ होतेय. १७ एप्रिल रोजी नागपूरमध्ये ४० अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. यात एका अंशाने वाढ होऊन ४१ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.तर गेल्या काही दिवसांत कोल्हापूरच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. १७ एप्रिल रोजी ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले . यात एका अंशाची वाढ होऊन ते ४२ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमध्ये १७ आणि उद्या १८ एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये देखील हिट वेव्ह असल्याचे चित्र आहे. नाशिकमध्ये १७ एप्रिल रोजी तापमान ४१ अंशांवर गेले . त्यामध्ये आणखी एका अंशाने घट होऊन ते ४० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.