BSPNewsUpdate : मायावती यांनी २४ तासात बदलला अमेठीचा उमेदवार , मौर्य यांच्या ऐवजी नन्हे सिंह चौहान लढणार…
लखनौ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपा सुप्रीमो मायावती यांनी अमेठीमध्ये बसपने अवघ्या २४ तासांत उमेदवार बदलला आहे. या जागेवर त्यांनी आता रविप्रकाश मौर्य यांच्या जागी नन्हे सिंह चौहान यांना उमेदवारी दिली आहे. बीएसपीने लोकसभा निवडणूक 2024 साठी आपल्या उमेदवारांची 10वी यादी जाहीर केली आहे. बसपने आपल्या यादीत अमेठीमधून नन्हे सिंह चौहान यांना उमेदवारी दिली आहे, तर प्रतापगढमधून प्रथमेश मिश्रा आणि झाशीमधून रवि प्रकाश कुशवाह यांना तिकीट दिले आहे.
बहुजन समाज पक्षाने काल म्हणजेच रविवारी (२८ एप्रिल) अमेठी जागेसाठी उमेदवाराचे नाव जाहीर केले होते आणि आज या जागेवरून उमेदवार बदलला आहे. रविप्रकाश मौर्य यांना पक्षाने प्रथम अमेठी मतदारसंघातून तिकीट दिले होते, मात्र आज पक्षाने पलटवार करत त्यांचे तिकीट रद्द करून त्यांच्या जागी नन्हे सिंह चौहान यांना उमेदवारी दिली आहे.
स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता
अमेठी ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जाते. या जागेसाठी काँग्रेसने अद्याप एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. मात्र या जागेवरून पक्ष राहुल गांधींना तिकीट देऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 2019 मध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता आणि यावेळी देखील भाजपने स्मृती इराणी यांना अमेठी मतदारसंघातून तिकीट दिले आहे. 2004 ते 2014 पर्यंत राहुल या जागेवरून सतत खासदार राहिले आहेत.
स्मृती इराणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी (२९ एप्रिल २०२४) यूपीच्या अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. स्मृती इराणी सकाळी 10 वाजता अमेठी मतदारसंघातून गौरीगंज येथील भाजप जिल्हा कार्यालयात पोहोचल्या आणि येथून त्यांनी रोड शो केला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून उमेदवारी दाखल केली.