AccidentNewsUpdate : ट्रक – बस अपघातात २५ प्रवासी जखमी
औरंगाबाद : जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. मालवाहू ट्रक आणि एसटी बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये २५ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर ट्रकचालक ट्रक घटनास्थळीच सोडून पसार झाला आहे. हा अपघात आडूळ परिसरात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. जखमींना स्थानिकांच्या मदतीने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. सुमारे अर्धा किलोमीटर लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
धडकेमुळे बसवरील नियंत्रण सुटले
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर औरंगाबादकडून एक मालवाहतूक करणारा ट्रक जात होता. या ट्रकला आडळू परिसरात बसने ओव्हरटेक केले. मात्र त्यानंतर या ट्रकने बसला मागून धडक दिली. मागून जोरदार धडक बसल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दुभाजकाला धडकली. अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.
या अपघातामध्ये बसमधील तब्बल २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली.