AurangabadNewsUpdate : मोठी बातमी : औरंगाबाद शहरातील पाणीपट्टीत ५० टक्के कपात; पालकमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा
औरंगाबाद: शहरात भर उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांना आठ तर काही वसाहतींना दहा दिवसानंतर पाणी मिळते, अशा स्थितीत ज्या प्रमाणात पाणी मिळते त्याच प्रमाणात पाणीपट्टी असावी, अशी मागणी नागरिकांची होती, यावर शुक्रवारी (दि.१३) पाणीपुरवठ्यासंदर्भातील बैठकीसाठी शहरात आलेले पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद शहरातील पाणीपट्टीत दोन हजार रुपयांची (५० टक्के) सवलत देण्याची घोषणा केली. समाधानकारक पाणी मिळेपर्यंत हा दर कायम राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
औरंगाबाद शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, शहरातील सिडको, हडको, गारखेडा परिसर तसेच जुन्या शहरातील अनेक वसाहतींना आठवड्यातून एक वेळा तर काही ठिकाणी दहा दिवसानंतर पाणी मिळते, एकीकडे कमी पाणी मिळत असताना महापालिका प्रशासनाकडून पाणीपट्टी मात्र पूर्ण वसूल करण्यात येत होती, ४ हजार ५० रुपये असलेली पाणीपट्टी कमी करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडे होती, त्यावर आता पालकमंत्री देसाई यांनी मोठा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिला आहे.