थंडी – तापेवर चुकीच्या उपचारामुळे रुग्णांना रक्ताच्या उलट्या
अंबरनाथ येथील रुग्णालयात थंडी, तापावर उपचार घेणाऱ्या १२ रुग्णांना डॉ. बी. सी. छाया यांनी मुदत संपलेले इंजेक्शन दिल्यामुळे रक्ताच्या उलट्या झाल्याची बाब उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडल्याने, रुग्णालयात खळबळ उडाली. दरम्यान तातडीने रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांनी धाव घेतली. या मध्ये काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी दोन रुग्णांना उपचारासाठी मुंबईत पाठवण्यात आले आहे.
डॉ. बी. सी. छाया रुग्णालयात थंडी आणि तापामुळे आजारी असेलेल्या १० ते १२ रुग्णांना सइपट्रेकझोन हे प्रतिजैविक इंजेक्शन देण्यात आले. या इंजेक्शनमुळे रुग्णांना अस्वस्थ वाटू लागले. थोड्या वेळाने या रुग्णांना रक्ताच्या उलट्या झाल्या. अचानक हा सर्व प्रकार घडल्यामुळे रुग्णांचे नातेवाईकही घाबरले. रुग्णांना तपासण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर रुग्णालयात आले. दरम्यान, रुग्णांच्या नातेवाईकांनी इतर नातेवाईकांनाही बोलावले. मुदत संपलेले इंजेक्शन दिल्यामुळे रुग्णांना त्रास झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.
या सर्व घडामोडींनंतर पोलीसही रुग्णालयात आले. त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना शांतेतेचे आवाहन केले आणि रुग्णालयातील इंजेक्शनचा साठा जप्त केला. दरम्यान, अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनिषा वाळेकर देखील घटनास्थली दाखल झाल्या. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय याप्रकरणाबाबत अंबरनाथचे मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर याबाबत माहिती टाकली आहे आणि रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराबाबतही टीका केली आहे.