वीजबिल वाढीवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; स्मार्ट मीटर निर्दोष असल्याचा दावा
राज्यात स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढत असल्याच्या तक्रारींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढत नसून यंदाच्या तीव्र उष्णतेमुळे वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने बिलात वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणानुसार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असून राज्यात आतापर्यंत 1 कोटी 23 लाख स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरबाबत सुमारे 3 लाख तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी स्वतंत्र तपासणीत केवळ 210 तक्रारीच योग्य आढळल्या, म्हणजेच तक्रारींचे प्रमाण अत्यल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाच्या उन्हाळ्यात राज्यात सलग तीन महिने हिटवेव्ह राहिल्यामुळे वीजेची मागणी 28 हजार मेगावॅटवरून 32 हजार मेगावॅटपर्यंत वाढली. बदलापूरमधील अभ्यासाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, तापमानात वाढ झाल्यामुळे घरगुती वीज वापरातही लक्षणीय वाढ झाली. 1 BHK घरातील सरासरी वापर 270 युनिटवरून 415 युनिट, तर 400 युनिट वापरणाऱ्या ग्राहकांचा वापर 600 युनिटपर्यंत पोहोचला.
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, टेलिस्कोपिक टॅरिफ पद्धतीनुसार 300 युनिटनंतर आणि 500 युनिटनंतर वीजदर वाढतात. त्यामुळे वापर वाढल्यास बिलही वाढते. ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवलेले नाहीत, तेथील ग्राहकांनाही अशाच प्रकारे वाढीव वीजबिल आले असल्याने याचा स्मार्ट मीटरशी संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला.
राज्यातील वीजपुरवठ्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राने यंदा 32 हजार मेगावॅटची विक्रमी मागणी पूर्ण केली असून राज्यात सर्वसाधारणपणे लोडशेडिंग नाही. काही ग्रामीण भागातील समस्या फीडर सेपरेशनमुळे निर्माण होत असून कृषी फीडरवरील ग्राहकांना टप्प्याटप्प्याने गावठाण फीडरवर आणण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
स्मार्ट मीटर, वीज बिल वाढ, Smart Meter Maharashtra, Devendra Fadnavis, Electricity Bill Hike, Heatwave Maharashtra, महावितरण, महाराष्ट्र वीज बातम्या, स्मार्ट मीटर तक्रार, महाराष्ट्र लोडशेडिंग
