MumbaiNewsUpdate : भारतीय संविधान बदलणे संघ आणि भाजपचा अजेंडा , प्रकाश आंबेडकर यांचे घणाघाती प्रहार …
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील संविधान सन्मान महासभेला संबोधित करताना देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष ओलांडली आहेत, ही ७० वर्ष ओलांडल्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे की या देशाचे संविधान बदलले पाहिजे की न बदलले पाहिजे या दृष्टीने ती चर्चा आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. या निवडणुकांच्या अगोदर या मुद्द्यांची चर्चा झाली पाहिजे, असा आमचा आग्रह असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुंबईच्या शिवतीर्थावर आयोजित विशाल संविधान सन्मान मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते . ते म्हणाले की , भारतीय संविधान बदलणे हा आर एस एस आणि भाजपचा अजेंडा आहे. स्वातंत्र्याच्या पासूनची त्यांची ही भूमिका आहे . माझा त्यांना प्रश्न आहे की , आज जी लोकशाही आहे त्याऐवजी ठोकशाही आणणार आहात का? ती ठोकशाही आणणार असाल ती कशा पद्धतीची असेल त्याचा आराखडा तरी सांगा? तुम्ही म्हणत असाल लोकशाही राहणार तर ती संसदीय लोकशाही असेल की अध्यक्षीय लोकशाही असेल त्याचं तरी काही सांगा? संसदीय लोकशाही चालवणार असाल तर सध्याच्या संसदीय लोकशाहीत काय कमी आहे, याची मांडणी करा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले , संविधानाशी ज्यांचा संबंध नाही त्यांनी याची चर्चा सुरु केली आहे. मोहन भागवत यांना मध्यंतरी आव्हान दिले होते की या देशाचा राष्ट्रवाद हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे की भौगौलिक राष्ट्रवाद हे सांगा असा सवाल केला होता. सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणता त्यावेळी तो भौगोलिक नाही. भौगोलिक राष्ट्रवाद नव्हता तेव्हा ब्रिटीश होते. त्यावेळी काँग्रेस आणि मुस्लिम लीग होती. त्या दोघांचे राजकारण कसे चालायचे ? वैदिक परंपरेशी संबंध असलेली लोक या देशाला गुलाम करण्याची भाषा करीत आहेत.
आरक्षणाच्या नावानं समाजा समाजाला भिडवलं जातंय…
आजच्या व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास आहे. आपली मागणी मांडण्याची संधी आहे त्याला विश्वास आहे. लढा उभा करण्याचा, धर्म पाळण्याचा अधिकार आहे हा लोकांना विश्वास आहे. हा विश्वास जर तुटला तर काय होतंय हे आपल्याला दिसतंय काय होतंय. आरक्षणाच्या नावानं समाजा समाजाला भिडवलं जातंय, एकमेकांच्या विरोधात लढवलं जात आहे. हे थांबवण्याऐवजी खतपाणी घातलं जात आहे. २००४ मध्ये गोध्रा झालं, २०२३ मणिपूर झालं, ३ डिसेंबरनंतर देशातील कुठल्यातरी संघर्ष उभा केला जाईल. भडकवणाऱ्या संघटना बऱ्याच आहेत, भडकवणाऱ्या संघटनेच्या नेत्याला त्यांच्या मुलाला पुढं आणायला सांगा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राजकारणातून देशात भीती निर्माण केली जात आहे …
सत्ता जशी जात आहे, तसे कार्यक्रम बदलत आहेत. सगळ्या गोष्टींचा वापर केला जाईल. मी आज सकाळपासून किती ठिकाणी धाडी पडल्या हे बघत होतो. माझ्या माहिती प्रमाणे ७ ठिकाणी धाडी पडल्या, गेल्या ९ वर्षात किती ठिकाणी धाडी पडल्या ते बघा. ज्यांच्या वर धाडी पडल्या त्यांची चौकशी झाली त्यांना कोर्टात उभं केलं नाही त्यांना लटकवत ठेवलेलं आहे. या राजकारणातून देशात भीती निर्माण करायची आहे, तुम्ही आमच्या विरोधात जाणार असाल तर धाडी टाकू, जेलमध्ये जाण्याचा धमक्या देत आहेत, आणि व्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
बहुजन आघाडी संविधानासाठी लढणार …
समाजाला अविकसित ठेवून समाजा समाजात भांडण लावण्याचं काम सुरु आहे. कापूस आणि त्याच्या मधील उत्पादन, सरकारला मिळणारा कर हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. हा लढा मोठा आहे. या लढ्याचा रिंग मास्टर नरेंद्र मोदी हे लक्षात घ्या, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. भाजप आणि आरएसएसला संविधान बदलायचं आहे पण वंचित बहुजन आघाडी संविधानाच्या बाजूनं राहणार, संविधानाच्या संरक्षणासाठी लढणार, संविधान जुनं झालंय सांगून बदलाच्या चर्चा सुरु आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. संविधान ही एक व्यवस्था आहे, राज्य चालण्याची व्यवस्था आहे, ही व्यवस्था जिच्या वर लोकांचा विश्वास आहे, आज तिला तुम्ही बदलाय सांगता पण नवी व्यवस्था काय येणार हे तुम्ही सांगा, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.
दरम्यान आपल्या भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांना इशारा देत आवाहन केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेते छगन भुजबळांना ‘भुजबळ तुम्ही माझ्या नादाला लागू नका. जेव्हा मंडल कमांडल असा वाद सुरू होता, त्यावेळी तुम्ही कुठे होतात? हे सर्वांना माहिती आहे” असे म्हणत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तर, ‘मराठा समाजाने देखील संयमानं वागावे’ असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात केले.
नाना पटोले यांचे आवाहन
या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही उपस्थिती होती. या सभेत नाना पटोले यांनी ‘वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेससोबत यावं’ असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांना केले. दरम्यान काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना वंचितचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महासभेचे आमंत्रण दिले होते; पण विधानसभा निवडणुकींचा प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी तसे पत्रही त्यांना दिले असून राहुल गांधी यांनी वंचितच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पटोले म्हणाले की , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाने माणसाला माणसासारखं जगण्याचा हक्क दिला पण भाजपा संविधानच मानत नाही, भाजपाचे नेते सातत्याने डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलण्याची भाषा जाहीरपणे करत असतात.
संविधान हा जगातील सर्वात पवित्र ग्रंथ आहे हा पवित्र ग्रंथ न मानणाऱ्यांना व तो बदलू पाहणाऱ्या भाजपाला आता धडा शिकवण्याची गरज आहे, असेही पटोले म्हणाले.