ManojJarangeNewsUpdate : … यांच्या सभांना दंगल सभा म्हणायला हवे , जरांगे यांचा भुजबळ आणि ओबीसी नेत्यांवर पलटवार
औरंगाबाद : मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण देण्याच्या मागणीवरून आणि वाढत्या कुणबी नोंदींवरून मराठा आणि ओबीसींमधला संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे. कारण कुणबी नोंदी शोधणारी शिंदे समिती बरखास्त करा तसेच दिलेल्या कुणबी प्रमाणपत्राला स्थगिती देण्याची मागणी भुजबळांनी केल्यानंतर आमच्या नोंदी रद्द केल्या तर तुमचंही आरक्षण रद्द होईल असा इशारा देताना यांच्या सभेला दंगल सभा असे म्हणायला हवे अशी प्रतिक्रियाही जरांगे पाटील यांनी दिली आहे.
इतकेच नाही तर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी आज एकमेकांची अक्कल काढली. जाळायला नाही, तर जोडायला अक्कल लागते अशा शब्दांत भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. त्यावर जोडायला अक्कल लागते, आधी नाही कळलं? असा उलटसवाल जरांगेंनी केला. मराठ्यांनी तुम्हाला जोडलं, मोठं केलं.. मात्र तुम्ही त्यांना तोडलं, असा पलटवार जरांगेंनी केला.
दरम्यान आपण वादग्रस्त किंवा भडकाऊ विधाने करत नाही असे म्हणताना , अजित पवारांनी आधी त्यांच्या माणसांना भडकाऊ विधानं करु नयेत हे सांगावं असं आवाहन जरांगे यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील सध्या छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात आहेत. अशक्तपणा जाणवत असल्याने जरांगेंवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना दोन दिवस रुग्णालयात राहावं लागणार आहे. मात्र लवकरच राज्यात चौथ्या टप्प्यातला दौरा करणार असल्याची माहिती जरांगेंनी दिली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ओबीसी नेत्यांनी हिंगोलीत महामेळावा घेतला. यात काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सोडून जवळपास सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात सर्व ओबीसी नेत्यांनी जरांगेंवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना तमाशासाठी ते जमिनी विकून दारुडे झालेत असा हल्लाबोल ओबीसी नेते टी.पी.मुंडे यांनी केला तर आमची लायकी काढणारे जरांगे कोण असा सवाल ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवडे यांनी केला आहे.
राज्यात दंगली व्हाव्यात, यासाठी त्यांचा प्रयत्न
दरम्यान राज्यात होत असलेल्या एल्गार सभांतून मंत्री छगन भूजबळ हे मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यात दंगली व्हाव्यात, यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याचे सभेतील नेत्यांच्या भाषणांतून दिसत असल्याने या सभांना आता दंगल सभा म्हणायला हवे, अशी टीका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री भुजबळ यांच्यावर केली.
रविवारी हिंगोली येथे ओबीसींचा एल्गार मेळावा झाला, या मेळाव्यात भूजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. यापार्श्वभूमीवर जरांगे यांनी रविवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला , ते म्हणाले की, अंतरवाली सराटी येथे पेालिसांनी आमच्यावर अमानुष लाठीहल्ला आणि गोळीबार केला. ही चुक झाल्याचे मान्य करीत गृहमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही गुन्हे मागे घेण्यात येईल असे सांगितले होते.आता मात्र पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे.
समाजात रोष वाढवू नका..
सरकारने शब्द दिला होता. मात्र, आता सरकारचं नेमकं अटक करण्याचे कारण काय, यात मी सखोल जाणार आहे. अटक का केली याची जालन्याला गेल्यानंतर माहिती घेतल्यानंतर अधिकृतपणे बोलेन. परंतु सरकारला विनंती आहे, समाजात रोष वाढवू नका, विनाकारण अटक करु नका, साखळी आणि आमरण उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांना त्रास होता कामा नये, त्यावर लक्ष द्यावे. हे आंदोलन आता अधिक व्यापक झाले आहे. त्यामुळे गुन्हे दाखल केल्याने मराठा समाज खचेल हा गैरसमज आहे, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे सरकणार नाही.
बीड मधील भूजबळांच्याच नातेवाईकांनीच हॉटेल पेटविली
दरम्यान बीड मध्ये झालेल्या जाळपोळीसारख्या हिंसक घटनेचे आपण समर्थन केले नाही याउलट मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी भूजबळ यांच्याच नातेवाईकांनी स्वत:ची हॉटेल पेटविल्याचा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला. कायदेशीर पदावर असलेल्या भूजबळ हे बीड येथे जाळपोळीची पहाणी करण्यासाठी गेले होते. अंतरवाली सराटी येथे पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या माझ्या,माय, माऊली दिसल्या नाहीत. कारण त्यांना मराठा समाजाबद्दल प्रचंड आकस असल्याचा आरेाप जरांगे यांनी केला.