NCPNewsUpdate : अजित पवार यांची याचिका फेटाळून लावा , जयंत पाटील यांचे निवडणूक आयोगाला पत्र
पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका देत आपल्या गटाकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर अजित पवार यांनी पुढचे पाऊल टाकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. आमचाच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करत चिन्ह देण्याची मागणी केली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत दोन गट झाले. त्यामुळे हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले. आता शरद पवार निवडणूक आयोगाकडे पोहचले आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर पक्षचिन्ह आणि पक्षनावावर त्यांनी दावा केला. ३० जून २०२३ त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्यामध्ये आम्हालाच पक्ष चिन्ह आणि नाव देण्याची मागणी केली होती. आमचा पक्षच खरा राष्ट्रवादी असल्याचा दावा करत त्यांनी आमदारांची प्रतिज्ञापत्रे जोडली होती.
आयोगाकडे ही याचिका असताना शरद पवार गटाही केंद्रीय निवडणूक आयोगात पोहचले आहे. शरद पवार गटाने अजित पवार यांनी दाखल केलेली याचिका अकाली आणि दुर्भाग्यपुर्ण आहे. त्यांनी केलेल्या याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचा उल्लेख केला नाही, किंवा तसा पुरावाही त्यांच्याकडे नाही, यामुळे अजित पवार गटाने केलेली मागणी फेटाळा, असे शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे यापूर्वी कॅव्हेट दाखल केले होते. तसेच विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या नऊ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणीही केली होती. आता निवडणूक आयोग शरद पवार गटाच्या याचिकेवर काय निर्णय देते, याकडे लक्ष लागले आहे..