MaharashtraPoliticalUpdate : उद्धव ठाकरे यांना भाजपची दारे खुली मात्र पुढाकार त्यांनाच घ्यावा लागेल : केशवप्रसाद मौर्य
पुणे : मोदी @ ९ महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मौर्य यांनी “उद्धव ठाकरेंसाठी भाजपाची दारं उघडीच आहेत,” अशी खुली ऑफर दिली असून मात्र त्यासाठी त्यांनाच भाजपला प्रस्ताव दिला पाहिजे कारण चूक त्यांनी केली आहे भाजपने नाही, असेही त्यांनी म्हटले आहे .यावर उद्धव ठाकरे यांच्यावतीने आता काय प्रतिक्रिया येणार ही पाहणे औत्सुकयाचे ठरणार आहे.
याबाबत एक वृत्त वाहिनीशी बोलताना मौर्य म्हणाले की , “उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मनात काही विचार असतील, तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्यांनी चर्चा करावी. भाजपाचे दरवाजे चर्चेसाठी कधीच बंद नसतात. भाजपाचे दरवाजे उघडीच असतात. पण, उद्धव ठाकरेंना चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. भाजपा चर्चेचा प्रस्ताव ठेवणार नाही. कारण, त्यांनी चूक केली आहे, भाजपाने चूक केली नाही,”
दुसरीकडे भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करताना , ‘बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही,’ अशी टीका केली आहे. याला शिवसेना ( शिंदे गट ) नेते विजय शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. याला उत्तर देताना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी , “अनिल बोंडे यांची उंची किती आहे. अनिल बोंडे माझ्याबरोबर मंत्री होते. त्यांची बुद्धी मला माहिती आहे. त्यामुळे अनिल बोडेंनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वक्तव्य केलं असेल, तर दुर्दैवी आहे. टीका कोणी करावी, यालाही महत्व असते. ताकदीच्या माणसाने टीका केली, तर उत्तर नक्की द्यायला हवं. देवेंद्र फडणवीसांच्या जवळील व्यक्ती दाखवण्यासाठी आणि स्वार्थ्यासाठी अशी गैरजबाबदार वक्तव्य करणं, चुकीचं आहे.”
अनिल बोंडे काय म्हणाले?
“देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचा चेहरा असून बहुजनांसाठी काम करत आहेत. ओबीसी, मराठा आरक्षण किंवा धनगर समाजासाठीचे निर्णय सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचे काम फडणवीसांनी केले. मी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्यांना फिरताना पाहिले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांना भाजपा आणि जनतेने स्वीकारले आहे. ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही. शिंदेंना त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. उद्धव ठाकरेंना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटायची. आता शिंदेंना वाटत आहे. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही,” असे अनिल बोडेंनी म्हटले होते. त्यावर “अनिल बोंडेंना विचारून युतीबाबत निर्णय घेतले जाणार आहेत का? कोण अनिल बोंडे? माणसाने लायकीत राहावं. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो,” अशा शब्दांत विजय शिवतारे यांनी खडसावले आहे.
दरम्यान एकीकडे शिवसेना शिंदे गटाच्या जाहिरातीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे त्यामुळे हा वाद नेमक्या कोणत्या टोकाला जाणार संगत येत नाही. बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल हॉट नाही अशी प्रतिक्रिया भाजप खासदार अनिल बोंडे यांनी दिली होती त्यावरूनही शिंदे गटाच्या आमदारांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचे भाष्य ..
या वादावर आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर भाषणात यावर भाष्य केले. ते गुरुवारी पालघरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरलो. एक पत्रकार आला आणि म्हणाला की, तुम्ही दोघांनी एकत्र प्रवास केला. कसं वाटतं आहे? आमचा २५ वर्षांपासून एकत्र प्रवास आहे, पण गेल्यावर्षभरात तो अधिक घट्ट आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कुणीही करण्याची गरज नाही.”
“एखाद्या जाहिरातीमुळे किंवा कुणाच्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये कुठे काही होईल इतकं तकलादू हे सरकार नाही. हे जुनं सरकार नाही. जुन्या सरकारमध्ये कुणी आधी भाषण करायचं आणि कुणी नंतर भाषण करायचं यावरून गच्ची पकडणारे आम्ही पाहिले. मात्र, हे सरकार सामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे”.
ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नही : एकनाथ शिंदे
पालघरमध्ये आज झालेल्या ‘शासन तुमच्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहिररीत्या भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचाही उल्लेख करताना टे म्हणाले की, “माझी आणि देवेंद्रजींची आताची दोस्ती नाही. गेल्या १५-२० वर्षांपासून दोस्ती आहे. ही दोस्ती जिवाभावाची मैत्री आहे. आमच्या दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे. ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नही. तुटणार नाही. कितीही प्रयत्न केला तरी. काही म्हणतात जय विरू की जोडी, काहीजण धरम-वीरची जोडी. ही जोडी खुर्चीसाठी, स्वार्थासाठी झालेली नाही. स्वार्थासाठी एकत्र झाले होते त्यांना सामान्य जनतेने बाजूला केले ”, असा टोलाही शिंदेंनी यावेळी लगावला