SabhajiBhideNewsUpdate : भिडे “क्लीन चिट” प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी केला गंभीर आरोप
पुणे : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना भिमा कोरेगाव प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून क्लीनचिट दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत . यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्या तपास अधिकाऱ्याने हे क्लीनचिट दिले आहे त्याने सुप्रीम कोर्टात दिलेले प्रतिज्ञापत्र वाचलेले नाही. त्यात सुप्रीम कोर्टाला असे कळवले आहे की, संभाजी भिडे आणि एकबोटे दोषी आहेत. त्यामुळे तपास अधिकाऱ्याने कुणाच्या तरी सांगण्यावरुन भिडे यांना क्लीनचिट दिली आहे.
खरे तर तपास अधिकाऱ्याने सर्वोच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र दिले आहे त्यात भिडेंना दोषी ठरवले आहे. आता भूमिका बदलल्यास तो तपास अधिकारीच विटनेस बॉक्समधे येईल. त्या अधिकाऱ्याला ग्रामीण पोलिसांनी सुप्रीम कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा सामना करावा लागेल.
प्रकाश आंबेडकर म्हणाले पुढे म्हणाले की , या निकषावर तपास अधिकारी आले कसे ? हा महत्वाचा भाग आहे. कोर्टात अजून त्यांचे नाव डिलिट करावे अशी कायदेशीर प्रक्रिया केलेली नाही, तिथे विरोध केला जाणार आहे. तपासासंदर्भातील कागदपत्रे तिथे मागवली जातील.
जयंत पाटील भिडे यांच्या पाया पडतात ..
दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील संभाजी भिडेंच्या पाया पडतात. त्यामुळे लक्षात घेतले जावे की सूत्रे कुठून हालत असतील. हा सगळा फ्रॉड आहे आणि त्याची कागदपत्रे माझ्याकडे आहेत असे शरद पवारांनी म्हटले होते. यानिमित्ताने राष्ट्रवादीमधील दुफळी बाहेर येतेय, असे मला वाटते.
प्रकाश आंबेडकर यांनी असेही म्हटले आहे की, ही सगळी साखळी आहे. सुप्रीम कोर्ट दोषी मानते आणि तुम्ही त्यांना निर्दोष म्हणता. मात्र नाव वगळल्याने हे प्रकरण मिटणार नाही. त्या ३९ जणांनी कुणाच्या सांगण्यावरुन केले . कुठल्याही गुन्ह्याला मायबाप असतो. हे सगळे समोर येईल.
भाजपवरही आरोप
दरम्यान या प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे की , भाजपचाही यात पूर्ण रोल आहे. इथल्या कुणालाही यशस्वीपणे सत्ता राबवायची असेल तर ज्या टेरेरिस्ट ऑर्गनायझेशन आहेत त्यांचा परिचय पोलिसांना करुन दिला पाहिजे. नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस अधिकाऱ्यांना एका ठराविक विचारसरणीचे लोकच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असतात अशी शिकवण दिली जाते. दुसऱ्या बाजूच्या लोकांबद्दल ते बोलत नाहीत.