STStrikeNewsUpdate : एसटीचे तीन हजाराहून अधिक कर्मचारी बडतर्फ तर ५००० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती !!
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच असून अद्याप कर्मचारी कामावर परत येत नसल्याने एसटी महामंडळाने अनेक कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती, बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. याबाबत बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येत नाही, असा इशारा एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी संपावर ठाम असणाऱ्या कामगारांना इशारा दिलाआहे.
याबाबत माहिती देताना शेखर चन्ने म्हणाले कि , “संप सुरू झाला तेव्हा पटावर ९२ हजार कर्मचारी होते. त्यानंतर रोजंदारीवर असलेल्या २००० लोकांची सेवासमाप्ती झाली. कालपर्यंत (१३ जानेवारी) ३१०० कर्मचारी सेवेतून बडतर्फ झालेत. साधारणतः या काळात संप केल्याने आणि इतर काही कारणाने आम्हाला ५००० कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त कराव्या लागल्या. साधारणतः ८७ ते ८८ हजार कर्मचारी आत्ता पटावर आहेत. यापैकी २६ हजार ५०० कर्मचारी आत्ता कामावर आहेत.”
बडतर्फ झाल्यावर त्याला कामावर घेता येत नाही…
दरम्यान बडतर्फ कर्मचाऱ्यांना वापसीचा काही मार्ग आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना शेखर चन्ने म्हणाले कि , बडतर्फ कामगारांना पुन्हा सेवेत घेता येत नाही, बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्यासाठी काही प्रक्रिया आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही आधीच सांगितलेले आहे कि , बडतर्फ झाल्यावर त्याला कामावर घेता येत नाही. ती तेवढी सोपी प्रक्रिया नाही. म्हणूनच कर्मचाऱ्यांना आमचे आवाहन आहे की अशाप्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्याची वेळ येऊ नये. त्यांना यातून पुढे त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रूजू व्हावे. बरेचश्या कर्मचाऱ्यांची कामावर हजर होण्याची इच्छा आहे. ते रुजू होत आहेत. सध्या महाराष्ट्रात सकारात्मक चित्र दिसून येत आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती सुरु
“एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले, तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. ७५० खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत आहेत. जे सेवानिवृत्त झाले आहेत, ज्यांचे वय ६२ पेक्षा कमी आहे, जे फिट आहेत त्यांना काही काळ कामासाठी घेणार आहोत. एसटी सेवा प्रवाशांना मिळावी हा खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यामागचा हेतू आहे,” असेही चन्ने यांनी सांगितले.