AurangabadNewsUpdate : मुंबई , पुण्यापाठोपाठ औरंगाबादच्या आठवीपर्यंतच्या शाळाही बंद !!
औरंगाबाद : मुंबई , ठाणे , नवी मुंबई , पुण्याच्या पाठोपाठ औरंगाबाद शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळाही उद्या दिनांक ६ जानेवारीपासून बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ३१ जानेवारीपर्यंत या शाळा बंद राहतील. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा नियमित सुरू राहणार आहेत.
औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या एका दिवसात तीन पटीने वाढली. दरम्यान राज्यात मुंबई पुणे शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर औरंगाबाद महापालिकेने शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला. पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद राहतील. शहरात पहिली ते सातवीपर्यंत शाळा २० डिसेंबरला सुरू करण्यात आल्या होत्या.
दरम्यान तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत या वर्गाच्या शाळा पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. शहरातील सर्व माध्यमांच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा गुरुवार ६ जानेवारीपासून बंद राहतील असे स्पष्ट करण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यात ३१ जानेवारी पर्यंत शाळा बंद राहतील. त्यावेळी असलेली परिस्थिती लक्षात घेत शाळा सुरू करायच्या की बंद ठेवायचा याबाबत निर्णय घेतला जाईल.