Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यात आणखी १५ दिवस निर्बंध , मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

Spread the love

मुंबई : राज्यातील करोना संसर्गाच्या  पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला.  जनतेवर निर्बंध लादावे लागतात या सारखे  दुसरे कटू काम नाही, पण ते मला नाईलाजाने करावे लागत आहे. आपल्या राज्याच्या व सर्वांच्या जीवाच्या काळजी पोटी करावं लागत आहे. असे  म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम राहातील असे जाहीर केले. तसेच, जिल्ह्यांमधील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन काही जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करावे लागतील, तर काही जिल्ह्यांमध्ये कदाचित निर्बंध शिथील केले जातील असे  देखील सांगितले .

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी लोकांना  जिद्दीने  आणि निश्चयाने  बंधने  पाळल्याबद्दल धन्यवाद देताना  जनतेचे आभारही मानले. याचबरोबर, आता आपण निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नाही. असेही ते म्हणाले. याशिवाय, तौते वादळग्रस्तांना मदत देण्यास सुरूवात होत असल्याचे ही सांगितले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ”काहीजण असे  म्हणत आहेत की लाट आता ओसरत आहे, मग आता काय करणार हे निर्बंध उठवणार का? याबाबत देखील तुम्हाला माहिती देण्याची आवश्यकता वाटते, की नेमके  आपण कुठे   आहोत? आज राज्यात १८ हजारांच्या आसपास रूग्ण संख्या आहे. मात्र दोन-चार दिवसांअगोदरचा आकडा पाहिला तर, गेल्या लाटेत जी सर्वोच्च संख्या होती. तिच्या तुलनेत आता थोडीशी कमी होते आहे. त्यावेळी आपण जे शिखर गाठलं होतं. ते सणासुदीच्या नंतर गाठलं होतं. यंदा ही परिस्थिती सणासुदीच्या अगोदर आलेली आहे. १७ ते १९ सप्टेंबर २०२० मध्ये राज्यात साधारण एका दिवसात आढळणारी रूग्ण संख्या ही २४ हजार होती. आता २६ मे रोजी २४ हजार ७५२ एवढे रूग्ण आढळलेले आहेत. आज साधारण ही संख्या १८ हजारापर्यंत आली आहे. म्हणजे अजूनही आपण म्हणावं तेवढं खाली आलेलो नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे यावेळी रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे आता आपण निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नाही. मात्र आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रूग्ण संख्या थोडीशी वाढताना दिसत आहे. ही जरा काळजीची बाब आहे. कारण, शहरी भागात हे प्रमाण कमी होताना दिसत असलं तरी ग्रामीण भागात हे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे ताबतोब थांबणं आवश्यक आहे.”

याचबरोबर ”ही दुसरी लाट ही अपेक्षेपेक्षा फार मोठी होती. या लाटेत अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावलेले आहेत. यापुढे मात्र असे  होऊ देता कामानये. कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच पालकत्व राज्य सरकार घेणार. त्यांना आम्ही अनाथ होऊ देणार नाही. याबाबत योजना तयार केली जात असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील निर्बंध नाइलाजाने पुढील १५ दिवस म्हणजे १५ जूनपर्यंत वाढवावे लागत आहे. नुसते निर्बंध वाढवत नाही आहोत, तर आता आपण जिल्ह्यानुसार आढावा घेऊन, काही जिल्ह्यांमध्ये हे निर्बंध कदाचित कडक करावे लागतील, तर काही जिल्ह्यात हे निर्बंध आपण थोडेफार शिथील करू शकू. मात्र निर्बंध जरी शिथील होत असले तरी धोका टळला असे  समजू नका” असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले .
तसेच, ”मला पूर्णपणे माहिती आहे की हे संकट फार विचित्र आहे. नुसतं हे संकट आता कमी झालं म्हणून घाई-गर्दीने रस्त्यावर उतरू नका. पण जर का रस्त्यावर उतरणार असाल, तर मी म्हणेन करोना योद्धे म्हणून रस्त्यावर उतरा. कोरोना दूत म्हणून उतरू नका. कोरोनाची साथ हा सरकारी कार्यक्रम नाही. ही सरकारी योजना नाही, की जिच्या विरोधासाठी तुम्ही रस्त्यावर उतराल.. असा जर का आपल्या मनात विचार असेल तर तो डोक्यातून काढून टाका.” असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!