समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; आयशर ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा, ५ जणांचा मृत्यू, १ गंभीर
महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील विरूल इंटरचेंजजवळ हा भीषण अपघात घडला. भरधाव आयशर ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चुराडा झाला. ही दुर्घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
अपघात नेमका कसा झाला?
प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कारला मागून येणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की कार पूर्णपणे चिरडली गेली. या अपघातात कारमधील चालकासह चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रकचालक गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ट्रकमधील क्लिनर गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, पुलगाव पोलीस, रुग्णवाहिका आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य राबविण्यात आले. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आणि महामार्ग प्रशासनाने अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले
मृतांचे मृतदेह पुलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुलगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
