MumbaiNewsUpdate : परमबीर सिंह -वाझे -गृहमंत्री वादात देवेंद्र फडणवीस यांचीही उडी
नागपूर । राज्याच्या राजकारणात सचिन वाझे यांच्या अटकेने वादळ उठलेले असतानाच आज परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर थेट आरोप केल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या लेटरबॉम्बनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी सुरू झाल्या असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब अत्यंत धक्कादायक असल्याचे नमूद करत आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पात्रात म्हटले आहे कि , परमबीर सिंह यांचे पत्र धक्कादायक आणि खळबळजनक असून महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. एका महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यावर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पत्रानंतर गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकार वाचवण्यासाठी अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करू नये. हा प्रकार राज्याला धोक्यात घालण्यासारखा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेहमी ज्या कणखरपणाबद्दल बोलतात तो त्यांनी आता कृतीत उतरून दाखवावा, असेही फडणवीस म्हणाले.
‘परमबीर सिंग यांनी या पत्रात त्यांनी जो संवाद जोडला आहे, त्यातून स्पष्ट होते की, पैशाची थेट मागणी झालेली आहे. ज्याप्रकारे पोस्टिंग, विशिष्ट अधिकार देणे यासाठी आर्थिक व्यवहार होतात, यातून पोलीस दलाचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होताना दिसते आहे. इतके गंभीर आरोप झाल्यानंतर गृहमंत्री आपल्या पदावर राहूच शकत नाही, असेही फडणवीस म्हणाले. या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणा किंवा न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हायला हवी. ही चौकशी निष्पक्ष होण्यासाठी गृहमंत्री देशमुख यांनी पदावरून दूर व्हायला हवे, असेही फडणवीस यांनी पुढे नमूद केले.