Aurangabad जळालेल्या प्लॉटींग एजंटचा अखेर मृत्यू , २३ जानेवारीला घडली होती घटना
प्लॉटची विक्री केल्यानंतर वारंवार पैशांची मागणी करुनही प्लॉटींग एजंटने पैसे दिले नाही. म्हणून भरदिवसा त्याला पेटविल्याची घटना मुकुंदवाडीतील विश्रांतीनगरात २३ जानेवारीला घडली होती. यामध्ये ६५ टक्के जळालेल्या शेषराव दगडू शेंगुळे पाटील (५४, रा. जयभवानीगर) यांचा मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मृत्यू झाला. दरम्यान, पुंडलिकनगर पोलीसांनी दाम्पत्य गजानन दत्तू जाधव, स्वाती गजानन जाधव (दोघे रा. राजनगर, मुकुंदवाडी) आणि स्वातीचा भाऊ श्रीराम उर्फ पप्पू मोहनराव सुरवसे (रा. भवानीनगर, जालना) यांना अटक केली होती. त्यांची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
चिकलठाणा, सुंदरवाडी परिसरातील वीस बाय तीसचा प्लॉट सात महिन्यांपुर्वी शेषराव शेंगुळे यांनी गजानन जाधव यांना तीन लाख २२ हजार रुपयात विकला होता. त्यानंतर सहा महिन्यात सातबाºयाला तुमचे नाव लावण्यात येईल असे जाधव दाम्पत्याला सांगितले होते. पुढे एक ते दिड महिन्यांपुर्वी जाधव दाम्पत्याने शेंगुळे यांच्या विश्रांतीनगरातील साई एंटरप्राईजेस या कार्यालयात जाऊन त्यांना प्लॉटची सातबाराची नोंद होत नाही. त्यामुळे प्लॉटचे पैसे परत करा, अन्यथा चेक द्या असे म्हणाले होते. त्यामुळे शेंगुळे यांनी सिडकोतील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा दोन लाख रुपयांचा चेक व नंतर सिडको बसस्थानकाजवळ उर्वरीत रकमेचा चेक दिला होता. मात्र, २३ जानेवारीला दुपारी दिडच्या सुमारास जाधव दाम्पत्य आणि सुरवसे असे शेंगुळे यांच्या कार्यालयात गेले. त्यांनी प्लॉटच्या साडेतीन लाखांची मागणी केली. तेव्हा त्यांना सध्या एक लाख रुपये देतो तर उर्वरीत रक्कम नंतर देतो असे सांगत असताना तिघांनी शेंगुळे यांच्या अंगावर पेट्रोल ओतले. त्यानंतर त्यांना पेटविण्यात आले होते. जळालेल्या अवस्थेतच शेंगुळे यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठले होते. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यावरुन तिघांना अटक केली होती. दरम्यान, घाटीत उपचार सुरू असताना आज सकाळी शेंगुळे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता तिघांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शेंगुळे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी घाटीत धाव घेतली.