MaharashtraNewsUpdate : रेमडेसिवीरबद्दल अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा मोठा खुलासा
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी कोरोनाबाधितांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील रेमडेसिवीरचा साठा वाढण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना १९ -२० एप्रिलनंतर सर्व काही सुरळीत होईल अशी ग्वाही दिली .
या विषयी बोलताना डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले कि , “आपल्याला लागणारे रेमडेसिवीरचे इंजेक्शन हे कंपन्यांकडून जवळपास आज १२ हजार ते १५ हजार एवढं कमी मिळालेले आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा अजूनही दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार आहे.” तसेच, “नुकतीच माझी काही कंपन्यांच्या एमडी व सीईओंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. भविष्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कशाप्रकारे त्या कंपन्यांच्या माध्यमातून ते वाढवून देतील? किती वाढवला जाणार आहे? कारण साधरण तीन आठवड्यांपूर्वी याच कंपन्यांच्या सीईओ व एमडींसोबत मी बैठक घेतली होती. त्यावेळेस मला त्यांनी पुढील १५ तारखेपर्यंतचा कार्यक्रम दिला होता. त्या कार्यक्रमानुसार दररोज ते महाराष्ट्रात ५५ हजार रेमडेसिवीर पुरवतील अशी ग्वाही त्यांनी दिली होती. परंत कालच्या तारखेपर्यंत सरासरी जर आपण पाहिली, तर ३७ ते ३९ हजारपर्यंतच त्यांनी रेमडेसिवीर पुरवले आहे.” असे ही डॉ.शिंगणे म्हणाले.
“ही सर्व आकडेवारी पाहता व दररोज रूग्णांची संख्या वाढत असताना आणि रूग्णांना रेमडेसिवीर देण्याच्या दृष्टीने आपण आपल्याला प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. त्यानुसार त्यांची व माझी चर्चा झालेली आहे. १९-२० एप्रिल नंतर हा पुरवठा सुरळीत होईल, अशा प्रकारचे त्यांनी मला आश्वासन दिलेले आहे.” असेही डॉ. शिंगणे म्हणाले.
दरम्यान केंद्र शासनाने अतिशय चांगला व महत्वपूर्ण निर्णय तीन- चार दिवसाअगोदर घेतला. रेमडेसिवीरची निर्यात बंदी त्यांनी केली हे खूप चांगल काम झाले आहे. यामुळे निर्यातीसाठी तयार असलेला रेमडेसिवीरचा मोठा साठा देशभरातील व काही महाराष्ट्रातील कंपन्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात या कंपन्यांना त्यांचा माल इथं विकण्यासाठी परवानगी देण्याबाबत आम्ही कालच बैठक घेतली आहे. शिवाय विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकरांशी देखील बोलणे झाले आहे. आता त्या कंपन्यांशी संपर्क साधण्याचं काम आमच्या विभागाकडून सुरू आहे.” अशी माहिती यावेळी शिंगणे यांनी दिली.