Aurangabad : भरधाव कारच्या धडकेत जालना येथील दोघी जागीच ठार, एकीची प्रकृती गंभीर

धुत हॉस्पीटल चौकात भीषण अपघात
औरंंंगाबाद : भरधाव वेगाने जाणा-या कारने दिलेल्या धडकेत दोन महिला जागीच ठार झाल्या. तर एक जण गंभीर जखमी झाली. हा भिषण अपघात शनिवारी (दि.७) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जालना रोडवरील धुत हॉस्पीटल चौकात घडला. अपघातात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळसाबाई दामोदर गायकवाड (वय ७०), आशामती विष्णू गायकवाड (वय ४२) दोघी राहणार देवठाणा, ता.मंठा, जि.जालना असे अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. तर आहिल्याबाई दादाराव गायकवाड (वय ५०, रा.देवठाणा, ता.मंठा, जि.जालना) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात जखमी झालेल्या तिन्ही महिला आपल्या एका नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नासाठी औरंगाबादला आल्या होत्या. धुत हॉस्पीटल चौकात त्या रस्त्याच्या कडेला थांबल्या असतांना चिकलठाण्याहुन सिडको बसस्थानक चौकाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारचालकाने तिघींना जोराची धडक दिली. या भिषण अपघातात तुळसाबाई गायकवाड व आशामती गायकवाड या दोघी जागीच ठार झाल्या. तर आहिल्याबाई गायकवाड या गंभीर जखमी झाल्या. अपघाता नंतर कारचालक भरधाव वेगाने घटनास्थळावरून पसार झाला.
अपघाताची माहिती मिळताच सिडको औद्योगिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघींना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी दोघींना तपासून मयत घोषीत केले. या अपघाताची नोंद सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक भानुदास खिल्लारे करंत आहेत.