‘सोनभद्र हत्याकांडाविरोधात आवाज उठविण्यास अनुमती मिळायला हवी’ – ममता बॅनर्जी

सोनभद्र हत्याकांडावरुन राजकारण तापण्याची शक्यता जास्त आहे. कारण शुक्रवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी हत्या झालेल्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी निघाल्या असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे प्रियंका गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेचा ममतांनी निषेध वर्तवला. ‘सोनभद्रमध्ये जे काही झाले ते फार वाईट घडले. सोनभद्रमध्ये दलितांवर अत्याचार झाले आहेत आणि जर कुणी याच्या विरोधात आवाज उठवत असेल तर त्यांना त्याची अनुमती मिळायला हवी’, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. सोनभद्र येथे बुधवारी झालेल्या हिंसाचारानंतर त्या भागात कलम १४४ म्हणजेस जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याच कायद्याअंतर्गत प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, याच गोष्टीचा निषेध ममता बॅनर्जी यांनी केला आहे. याशिवाय ‘भाजपने पश्चिम बंगालमध्ये जमाव बंदी असतानाही शक्ति प्रदर्शन केले होते. त्यावेळी तर भाजपच्या तब्बल ५० गाड्यांनी कायद्याचे उल्लंघन केले होते. प्रियंका तर फक्त चार जणांना आपल्या सोबत घेऊन गेल्या होत्या. जमावबंदीत तीन ते चार लोक एकत्र फिरु शकतात. आम्ही भाटपारामध्ये तसेच केले होते. आम्ही कोणलाही थांबवत नाही. मात्र भाजप असे वागते आणि आमच्याबाबत गैरसमज पसरवला जातो’, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.