‘भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा संसद मोर्चा होणार’; अभिजित दीपके यांचा दावा, जंतर-मंतरवर कडेकोट पोलीस बंदोबस्त
नवी दिल्ली: संसदेकडे प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांनी मोठा दावा केला आहे. जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी समर्थकांना संबोधित करताना त्यांनी, “भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघणार आहे,” असे म्हटले.
दीपके म्हणाले, “गेल्या १०-१२ वर्षांपासून देशातील लोकशाही कमकुवत करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, जंतर-मंतरवर महिनाभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे लोकशाहीला पुन्हा बळ मिळाले आहे. देशभरातून लोक येथे दाखल होत आहेत. मी अमेरिकेत असताना अनेकांनी सांगितले होते की हे आंदोलन केवळ सोशल मीडियापुरतेच राहील. पण आज जंतर-मंतरकडे येणारे चारही प्रमुख रस्ते समर्थकांनी गच्च भरले आहेत. आम्हाला संसदेकडे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.”
जंतर-मंतरवर सुरक्षा व्यवस्था कडक
दरम्यान, सीजेपीने दिलेल्या संसद मोर्चाच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) तसेच दिल्ली पोलिसांचे मोठे पथक जंतर-मंतर येथे तैनात करण्यात आले असून, परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मोर्चाला परवानगी नसल्याचे दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण
याआधी नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा यांनी स्पष्ट केले होते की, संसद मोर्चासाठी दिल्ली पोलिसांकडे कोणताही अर्ज प्राप्त झालेला नाही आणि कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.
त्यांच्या माहितीनुसार, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ अंतर्गत संपूर्ण नवी दिल्ली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. त्यामुळे पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव, मोर्चे आणि निदर्शने करण्यास बंदी आहे. जंतर-मंतर येथेही पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करण्यास परवानगी नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
संसद अधिवेशनामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क
सोमवारपासून (आजपासून) संसद अधिवेशन सुरू होत असल्याने संसद भवन परिसरासह नवी दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिल्ली पोलीस आणि RAF सतर्क असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
