MarathaAndolanUpdate : सदावर्ते यांच्या गाडीवरील हल्ल्याचे समर्थन नाही , जरांगे यांचे उत्तर
जालना : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली असून, यासाठी मनोज जरांगे जबाबदार असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. दरम्यान, सदावर्ते यांचे सर्व आरोप मनोज जरांगे यांनी फेटाळून लावले आहे. सदावर्ते यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही, मात्र, त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचे आम्ही समर्थन करणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
सदावर्ते यांच्या आरोपाला उत्तर देतांना जरांगे म्हणाले की, “नेमकं काय झालं आहे, त्याबद्दल मला काहीच माहित नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. जर सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला झाला असेल, तर त्याचे आम्ही समर्थन करत नाही. तसेच, सदावर्ते यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. या हल्ल्यासाठी ते कोणाचे देखील नाव घेतील. उद्या ते देवेंद्र फडणवीस यांचे नाव देखील घेतील. आम्ही कसे उपोषण करावे याबद्दल त्यांनी सांगण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचे पाहावे. मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न सदावर्ते करतात. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, असे जरांगे म्हणाले.
मराठा क्रांती मोर्चाचा खुलासा
दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हल्लेखोर मुंबईचे नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा तरुणांच्या भावना तीव्रता असल्याने भावनेच्या भारत हे कृत्य केले असण्याची शक्यता मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दर्शवत सोलापूरच्या माढ्यातील गावोगावी बोर्ड लागले आहेत. सर्व पक्षीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली असून तालुक्यातील ३७ पेक्षा जास्त गावांमध्ये निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षण देऊनच गावात या, असे बोर्ड लागले आहेत.
मराठा समाजाने सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. तसेच मोहोळ तालुक्यातील अंकोली गावात मराठा समाजाने काढला कँडल मार्च काढला आहे. जोवर आरक्षण मिळत नाही तोवर कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होणार नाही. त्याचबरोबर राजकीय नेत्यांना गावात येऊ न देण्याची यावेळी शपथ घेण्यात आली. या कँडल मार्चमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.