Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : अजित पवारांची एंट्रीने शिंदे गटात तणाव …ध्वजारोहण आणि पालकमंत्री कोण यावरून तिन्हीही गटात वादावादी

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून अजित पवार महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ होत आहे. सत्तेची समीकरणेही पूर्णपणे बदलली आहेत. अजित पवार गटाच्या शपथविधीनंतर शिंदे गटाने पवार गट आणि भाजपमध्ये खडाजंगी सुरू केली आहे. सध्या मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. या सगळ्यात पालकमंत्र्यांचा कार्यकाळही वाढत आहे.

या शिवाय राज्यातील प्रकल्पांच्या प्रगतीवर नक्की देखरेख कोण ठेवणार हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या नोकरशाहीसमोर उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील वॉर रूमच्या माध्यमातून आत्तापर्यंत करण्यात येत असलेली देखरेख बाजूला सारून नवीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’च्या माध्यमातून गुरुवारी एक बैठक घेतल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. आश्चर्य म्हणजे वॉर रूमचे सर्वेसर्वा असलेले व तीन वेळा मुदतवाढ मिळालेले अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना पवार यांनी या बैठकीपासून लांब ठेवल्याने चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान पुणे, नाशिक, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदासाठी अजित पवार गटाकडून दावा केला जात आहे. यावरून शिंदे गटात सर्वाधिक गोंधळ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे , रायगड , नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? यावरून चांगलीच चर्चा रंगली आहे. भरत गोगवाले यांचा शिंदे गटाचा दावा आणि त्यांनी आदिती तटकरे यांच्या विरोधात केलेले वक्तव्य यावरून रायगड येथे बराच वाद झाला होता. या सगळ्यात १५ ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. २८ जिल्ह्यांत २८ मंत्री ध्वजारोहण करणार असून सात जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

अजित पवार गटाचे मंत्री कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार (कोल्हापूर), छगन भुजबळ (अमरावती), दिलीप वळसे पाटील (वाशिम), हसन मुश्रीफ (सोलापूर), धनंजय मुंडे (बीड), धर्मराव आत्राम (गडचिरोली), संजय बनसोडे (लातूर), अनिल पाटील (बुलढाणा). ) आणि अदिती तटकरे यांना पालघरमध्ये झेंडा फडकवण्याची संधी देण्यात आली आहे. तात्पुरत्या स्वरूपात ध्वजारोहणाची जबाबदारी नव्या मंत्र्यांकडे देण्यात आली आहे.

दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने आणि अजित पवार गटाची सत्तेत एंट्री झाल्याने शिंदे गटातील कुरबुरी वाढत आहेत. त्याची नाराजी स्पष्टपणे दिसून येते. खातेवाटप आणि पालकमंत्र्यांच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या खात्यांमध्ये कपात होणार का? त्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे असतानाही नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यंदिनी, दि. १५ ऑगस्ट रोजी शासकीय ध्वजवंदन करण्याचा मान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना मिळाला आहे. त्यामुळे पालकमंत्रिपद बदलाच्या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे.

विदर्भाचा बॉस कोण?

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण होणार आहे. तर वर्धा, गोंदिया, भंडारा, अकोला जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात हे जिल्हे भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेडमध्येही जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. रायगडमध्ये जिल्हाधिकारी ध्वजारोहणही करतील. त्यामुळे या जिल्ह्याबाबत अजित पवार आणि शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला त्यांच्या आवडीचे जिल्हे मिळाले आहेत. अशा स्थितीत पालकमंत्रिपदावरही शिंदे गटाची कोंडी होणार की भाजप दोघांमध्ये समेट घडवून आणणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे उत्तर मंत्रिमंडळ विस्तारातच मिळेल.

वॉर रूमवरूनही अधिकाऱ्यांमध्ये धुसपूस

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वॉर रूम सुरू करण्यात आली होती. राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे काम कोठपर्यंत आले यावर देखरेख ठेवणे, त्याच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर करणे असे या वॉर रूमच्या कामाचे स्वरूप होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांच्या पुढाकाराने अशाच प्रकारच्या कामासाठी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’ म्हणजेच नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला होता. सत्ताबदल झाल्यावर हा कक्ष मोडकळीस आला होता. अजित पवार यांनी त्याला संजीवनी देतानाच मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्याची चर्चाही आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!