CongressNewsUpdate : लोकसभेच्या तयारीसाठी काँग्रेसची दिल्लीत बैठक , लोकसभेच्या ४८ जागांवर लक्ष …
नवी दिल्ली : काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने आज महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन राज्याच्या अनुषंगाने विविध विषयावर महत्वाचे निर्णय घेतले असल्याचे वृत्त आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव के.सी.वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आदींची उपस्थिती होती. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकांसदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती नाना पटोले यांनी बैठकीनंतर दिली.
राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकारांशी बोलताना म्हणाले की , “काँग्रेस एकसंघ असून महाराष्ट्रात काँग्रेस फुटणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष काँग्रेस असेल. काँग्रेसची सध्या लाट आहे. आज लोकांनी ते मान्य केलं आहे, त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेलच. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमचे ४८ जागांवर काम सुरू आहे. जर आघाडी झाली तर आमच्या पक्षाची ताकद त्यांना मिळेल. महाराष्ट्र असे राज्य आहे जिथे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. जे आमच्यासोबत येतील, त्यांना आमचा फायदाच होणार आहे.
महाराष्ट्र में जब भी चुनाव होगा कांग्रेस सबसे बड़ी पार्टी बनकर सामने आएगी।
हम महाराष्ट्र में एक बस यात्रा निकालेंगे और मोदी सरकार ने कैसे डर पैदाकर महाराष्ट्र की विचारधारा को खरीदने का काम किया है- ये बात जनता को बताएंगे।
: महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री @NANA_PATOLE pic.twitter.com/IQTN7YjONt
— Congress (@INCIndia) July 11, 2023
भाजपाविरोधात पदयात्रा काढणार
“महाराष्ट्रात जिल्हा आणि ब्लॉक पातळीवर पक्ष संघटन केलं जाईल. पदयात्रा काढली जाईल. या पदयात्रेतून नरेंद्र मोदी सरकारच्या आणि महाराष्ट्रातील तिघाडा सरकारमध्ये कसा ईडी आणि खोक्याचा वापर झाला आहे , भीती घालून महाराष्ट्राची विचारधारा विकत घेण्याचे काम मोदींनी केले आहे हे जनतेत आम्ही जाऊन सांगणार आहोत. भाजपाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. गरिबांच्या या समस्या लक्षात घेऊन आम्ही जनतेपर्यंत पोहोचणार आहोत. भाजपा सत्तेसाठी काहीही करू शकते. पैशांतून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे भाजपाचं धोरण आहे, हे आम्ही जनतेला जाऊन सांगू”, असंही नाना पटोले म्हणाले.
बैठकीत काय ठरलं?
आजपासून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, सर्व वरिष्ठ नेत्यांनी संसदीय मतदारसंघांची जबाबदारी स्वीकारण्याचे ठरवण्यात आले आहे. तसेच, सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये एकत्रित बस यात्राही काढण्यात येणार असल्याची माहिती के.सी. वेणुगोपाल यांनी माध्यमांना दिली.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?
दरम्यान या बैठकीचा फोटो शेअर करत खर्गे यांनी ट्विट केले की, “भाजपने वॉशिंग मशीन वापरgन महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावण्याचे काम केले आहे. या राजकीय खेळाला काँग्रेस पक्ष सडेतोड उत्तर देईल. भाजपकडून जनादेशावर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांना महाराष्ट्रातील जनता सडेतोड राजकीय उत्तर देईल.आमचे नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे सरकार परत मिळवून देतील. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आम्ही आमचे स्थान टिकवून ठेवले आहे. महाराष्ट्र आणि काँग्रेस यांच्यातील वैभवशाली नाते आम्ही आणखी दृढ करू.”
राज्यातील २० जागांवर अधिक लक्ष
नेत्यांनी आपापसातले वाद मिटवून कामाला लागावं असा सल्ला काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिला आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या घडामोडींचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ नका असाही सल्ला देण्यात आला आहे. लोकसभेसाठी किमान २० जागांचं टार्गेट काँग्रेस कमांडकडून महाराष्ट्र प्रदेश समितीला देण्यात आलं आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, सतेज पाटील, अशोक चव्हाण, वर्षा गायकडवाड, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते.