MaharashtraNewsUpdate : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर आज मुंबई उच्चन्यायालयात सुनावणी …
मुंबई : बहुचर्चित औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलण्याच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. राज्य शासनाने या दोन्ही शहरांच्या नाव बदलण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे कि , १९९८ साली उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धारशिव करण्यात आले होते, हा निर्णय शासनाने २००१ साली रद्द केला. राज्य शासनाने घेतलेला नामांतर निर्णय हा फक्त राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात आहे. फक्त राज्यामध्ये सत्तांतर झाले म्हणून असे नामांतरचे निर्णय घेता येणार नाही. तसेच नामांतराचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे असे याचिकेत नमुद केले आहे. या जनहित याचिकेत याचिकाकर्त्यांनी १६ जुलैचा उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यास अंतरिम स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयासमोर आज 23 ऑगस्टला सुनावणी ठेवण्यात आली आहे.
एकीकडे राज्यात सत्ता संघर्ष चालू असताना महाविकास आघाडी सरकारने जाता जाता औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने राज्यातील या दोन शहरांचा नामांतर ठराव रद्द करून परत नव्याने हाच निर्णय परत घेतला यात औरंगाबादच्या नामांतराच्या छत्रपती संभाजी नगर असा बदल करण्यात आला.
दरम्यान याचिकाकर्त्यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या या घेतलेल्या दोन्ही निर्णयांना मुंबई उच्चन्यायालयात आव्हान दिले आहे. शेख इस्माईल मसूद शेख व इतर १६ जणांनी मंत्रिमंडळाच्या १६ जुलै २०२२ च्या उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा असे नामांतराच्या करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ऍड. सतीश बी. तळेकर यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.