MumbaiNewsUpdate : हनुमान चालीसा पठण अट्टाहास : राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई : अमरावतीवरून येऊन हनुमान चालीसाच्या निमित्ताने मुंबईत गोंधळ घालणाऱ्या राणा दाम्पत्याला आज न्यायालयाने कुठलाही दिलासा नसल्याने न्यायालयीन कोठडीतील त्यांचा मुक्काम वाढला आहे . आज त्यांच्या प्रकरणात सुनावणी होणार होती परंतु ती आता उद्यावर गेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट अमरावती या राखीव मतदार संघातील खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना चांगलाच महागात पडला आहे. खा. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आपल्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याच्या मागणी करणारी याचिका न्यायालयात सादर केली होती. न्यायमुर्ती वराळे आणि मोडक यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमुर्तींनी राणा दाम्पत्यांची चांगलीच कानउघडणी केली होती.
राणा दाम्पत्य २४ एप्रिलपासून न्यायालयीन कोठडीची हवा खात आहेत. त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याबरोबरच राजद्रोहाचाही गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र, आज जामीन अर्जावर होणारी सुनावणी उद्यावर ढकलली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आधीच स्पष्ट केले होते की, शुक्रवारी शक्य झाले तर सुनावणी घेण्यात येईल. मात्र, न्यायालयात आधीच अनेक प्रकरणांची सुनावणी आहे. त्यामुळे आज सुनावणी शक्य नसल्याचे सांगून त्यांची हि सुनावणी उद्यावर ढकलली आहे. उद्या दुपारी ३ वाजता हि सुनावणी होईल.
उद्या सुनावणी होण्याची शक्यता
राणा दाम्पत्याने अमरावतीवरून मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांच्या बाबत अपशब्द वापर करुन त्यांना आणि शासनाला खुले आव्हान दिले. दरम्यान त्यांना मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य न करण्याबाबत कलम १४९ अंतर्गत नोटीसही देण्यात आली होती की, मात्र त्यांनी त्या नोटीसला न जुमानता शासनाला आव्हान दिले त्यावरून आरोपींविरोधात १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आज सरकारी वकील आपले लेखी म्हणणे मांडणार होते. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाचे कामकाज व्यस्त असल्याने आज सुनावणी घेणे शक्य नाही. त्यामुळे आता राणा दाम्पत्याच्या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. दोन वेगळ्या घटना असल्यामुळे गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. मात्र दुस-या एफआयआरमध्ये कारवाईपूर्वी आरोपींना 72 तास आधी नोटीस देणे आवश्यक आहे, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. तर ३५३ च्या गुन्ह्यात राणा दाम्पत्यांना दिलासा मिळाला आहे. एफआयआरमध्ये कारवाईपूर्वी आरोपींना 72 तास आधी नोटीस देणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.