CoronaMaharashtraUpdate : दिलासादायक : ५३ हजार ६०५ नवे रुग्ण , ८२ हजार २६६ रुग्णांना डिस्चार्ज
मुंबई : राज्यात आज विक्रमी संख्येने रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासात राज्यात तब्बल ८२ हजार २६६ रुग्णांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा खाली आला आहे तर त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचा टक्काही थोडा वाढला आहे.
दरम्यान राज्यात आज ५३ हजार ६०५ नवीन रुग्णांची नोंद झाली असली तरी त्याचवेळी ८२ हजार २६६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण करोनामुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे. मुख्य म्हणजे यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ६ लाख २८ हजार २१३ इतका खाली आला आहे.
राज्यात सध्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असले तरी आज त्यात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता १ लाख ६ हजार ८२९ वर आला आहे. नागपूर जिल्ह्यात सध्या ६२ हजार २४८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबई पालिका क्षेत्रात हा आकडा ५२ हजार ८७४ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ४३ हजार ५१० तर नाशिक जिल्ह्यात ४० हजार १४१ रुग्ण आहेत.
राज्यात आज ८६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद
– सध्या राज्यातील करोना मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
– आज राज्यात ५३,६०५ नवीन रुग्णांचे निदान.
– आज ८२,२६६ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– आजपर्यंत एकूण ४३,४७,५९२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.०३ % एवढे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९१,९४,३३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५०,५३,३३६ (१७.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात ३७,५०,५०२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २८,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.
– अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ६ लाख २८ हजार २१३ इतका आला खाली.