AurangabadEducationUpdate : औरंगाबाद : सुरु होताहेत शाळा, शहरात विद्यार्थ्यांविना तर ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसह… !!
राज्यात सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असले तरी, त्या-त्या जिल्ह्यासाठी हे आदेश ऐच्छिक असल्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केल्यामुळे राज्यातील कुठल्या जिल्ह्यातील शाळा सोमवार पासून सुरू होतील किंवा बंद राहतील हे पूर्णतः अद्याप स्पष्ट झालेले नाही . दरम्यान मुंबई आणि ठाणे पाठोपाठ औरंगाबाद जिल्हा आणि शहर प्रशासनाने आपला निर्णय जाहीर केला आहे.
या विषयाच्या संदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जिल्ह्यातील शाळेच्या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आणि डिजिटल शिक्षणाच्या मर्यादा लक्षात घेता सोमवारपासून ग्रामीण भागातील शाळा सुरू होत आहेत. मात्र यासाठी पालकांच्या संमतीची गरज आहे.
दरम्यान शहरातील शाळांच्या बाबतीत माहिती देताना महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे म्हणाले की, शहराची एकूण कोरोनाची स्थिती लक्षात घेता, औरंगाबाद शहराच्या हद्दीतील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत मात्र शहरातील विद्यार्थ्यांना मात्र तीन जानेवारी पर्यंत अनुपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे . त्यामुळे शहरातील शाळा विद्यार्थ्यां विना सुरू होतील असे चित्र आहे. अस्तिक कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात महापालिकेच्या ७२ शाळा असून त्यापैकी १७ माध्यमिक शाळा आहेत तर शहरातील सर्व शाळांची संख्या ३६१ इतकी आहे . सुमारे ७८ हजार विद्यार्थी संख्या आहे तर साडेतीन हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत.