#CoronaIndiaUpdate : धक्कादायक : जागतिक क्रमवारीत चीन, इटली, स्पेनला मागे टाकून भारत पाचव्या स्थानावर
देशात केंद्र आणि राज्य शासनाने अर्थव्यवस्था पूर्ववत करण्याच्या उद्देशाने बऱ्याच अंशी लॉकडाऊन शिथिल केला असला तरी देशात वाढत असलेला कोरोना रुग्णसंख्येचा दर देशाची चिंता वाढवणाराआहे. गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा रुग्णांची विक्रमी संख्या समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या 24 तासांत 9971 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर 287 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढून 2 लाख 46 हजार 628 झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या जागतिक आकडेवारीनुसार देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 47 हजार 040 इतकी झाली असून भारत हा आता जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या क्रमवारीत स्पेनला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
स्पेनमधील रुग्णसंख्या 2 लाख 41 हजार 310 आहे. दरम्यान भारत सरकारच्या दाव्यानुसार देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी कोरोना रुग्णांचा मृत्यू दर कमी असून उपचार दर अधिक आहे हि दिलासादायक बाब आहे मात्र WHO च्या मतानुसार भारतात संसर्ग विस्फोटाचा धोका कायम आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते चीन आणि भारताने टेस्टची संख्या वाढवल्यास अमेरिकेपेक्षा अधिक रुग्णसंख्या भारत आणि चीनमध्ये दिसेल.
युरोपातील देशांपैकी इटली आणि स्पेन हे देश सर्वाधिक प्रभावित झाले होते. या क्रमवारीत आठवडय़ाभरापूर्वी भारत नवव्या स्थानावर होता. करोनाचे उगमस्थान असलेल्या चीनच्या रुग्णसंख्येपेक्षाही भारतातील रुग्णसंख्या अधिक आहे. शुक्रवारी कोरोनाची 9887 नवीन प्रकरणं नोंदवली गेली होती, तर कोरोनामुळे 294 लोकांचा मृत्यू झाला होता. आताच्या आकडेवारीनुसार कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत आता भारताने स्पेनलाही मागे टाकलं आहे. देशात सध्या कोरोनाची 1,20,406 सक्रिय प्रकरणं असून कोरोना साथीच्या आजारामुळे 6,929 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1,19,292 लोक बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
दरम्यान यापूर्वी शनिवारी आलेल्या आकड्यांवरून भारत इटलीला मागे टाकत साथीच्या रोगामुळे सर्व देशांमध्ये सर्वाधिक रुग्ण असलेल्या भारत जगातील सहावा देश बनला होता. पण आता भारतात पुन्हा कोरोनाच्या आकड्यांनी कहर केला आहे. त्यामुळे आता स्पेनलाही मागे टाकून 5 वा सर्वात संक्रमित देश बनला आहे.
महाराष्ट्रावर कोरोनाचा मोठा परिणाम
कोरोना व्हायरसचा सगळ्यात मोठा परिणाम हा महाराष्ट्रात झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 80 हजार 229 व मृत्यू 2849 सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात शनिवार कोव्हिड-19 मुळे मुंबईत 58 लोकांसह आणखी 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या महामारीमुळे आतापर्यंत मृतांची संख्या 2,969वर पोहोचली आहे. तर 2,739 नवी प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात कोरोना संक्रमणाची एकूण संख्या 82,968 झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र कोव्हिज-19 मुळे रुग्ण बरे होण्याचा दर 45.06 टक्क्यांपर्यंत आहे तर मृत्यूदर 3.57 टक्के आहे. त्यानंतर, रुग्णसंख्येमध्ये तमिळनाडू 28694, दिल्ली 26334 आणि गुजरात (19 हजार 94) या राज्यांचा क्रमांक लागतो. राजस्थान आणि उत्तर प्रदेशने रुग्णसंख्येमध्ये 10 हजारांचा आकडा गाठला आहे. मध्य प्रदेशही 9 हजारांच्या नजीक पोहोचला आहे. आसाम आणि केरळमध्येही रुग्ण वाढू लागले आहेत. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक मृत्यू गुजरात (1,190) व दिल्ली (708) या दोन राज्यांमध्ये झाले आहेत.
जगातील सर्वात बाधित देश
अमेरिका : 1920061
ब्राझील : 672846
रशिया : 458102
ब्रिटन : 286294
भारत : 247040
स्पेन : 241310
इटली : 234801
भारतात संसर्ग विस्फोटाचा धोका कायम
भारतातील कोरोनाच्या स्थितीवर भाष्य करताना WHO ने म्हटले आहे कि , भारतात आतापर्यंत कोरोना संसर्गाचा विस्फोट झाला नसला तरी तो होण्याची जोखीम कायम आहे. कारण टाळेबंदी उठवण्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या वाढू शकते, कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग भारतात आता तीन आठवडे आहे. याचा अर्थ ही वाढ घातांकी नसली तरी ती कमी झालेली नाही. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मतानुसार भारत आणि चीन यासारख्या मोठय़ा लोकसंख्येच्या देशांनी जर कोविड १९ चाचण्या वाढवल्या तर त्यांना त्यांच्याकडील करोना रुग्णसंख्या अमेरिकेपेक्षा जास्त असल्याचे दिसेल. भारत व चीन यांनी कमी चाचण्या केल्याने तेथे रुग्णांची संख्या कमी आहे.