#CoronaLatestUpdate : एक नजर : या क्षणाची बातमी , पहा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची अवस्था काय ?
गेल्या २४ तासात ७७१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ इतकी झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७६ हजार ३२३ नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार ३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करिता निगेटिव्ह आले असून, १४ हजार ५४१ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यत राज्यातून २ हजार ४६५ रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात १ लाख ९८ हजार ०४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, १३ हजार ००६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ५८३ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशिरा दिली. मुंबईत करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९ हजार ३१० झाली असून, मुंबई महापालिका हद्दीतील मृतांचा एकूण आकडा ३६१ इतका झाल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक शहरात सर्व काही आलबेल आहे अशा तोऱ्यात वावरणाऱ्या नागरिकांसाठी धक्कादायक बातमी आहे. शहरातील एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेचा अहवाल मंगळवारी सकाळी प्रशासनाला प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात पहिल्या करोना बळीची नोंद झाली असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १३ झाली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ३८२ झाली असून आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या सटाणा तालुक्यातही करोनानं शिरकाव केला आहे.
नागपूर: सतरंजीपुरा येथील ४५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह… शहरातील एकूण रुग्णसंख्या १६१ वर
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी नऊ रुग्णांना कोरोनाची लागण, यात दीड महिना आणि चार वर्षाच्या चिमुरड्यांचा समावेश, पिंपरी चिंचवडमध्ये एकूण रुग्णांची संख्या१४२ वर गेली असून शहराबाहेरील १० रुग्णांचा यात समावेश
औरंगाबाद: टाऊन हॉल परिसरातील ५८ वर्षीय करोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू… करोना मृतांची संख्या ११ वर , आणखी २४ व्यक्तींना करोनाची लागण. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३२१ वर
अकोल्यात आज ११ नवे करोना रुग्ण… रुग्णसंख्या ७५ वर
कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १५ वर.
अमरावतीमध्ये आणखी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह; कोरोना रुग्णांची संख्या ६५ वर
औरंगाबाद: गुटखा विक्रेत्याकडून १५ हजारांची लाच घेताना जवाहर नगरमध्ये कर्मचाऱ्यास अटक, जमादार यामाजी खाटने असे कर्मचाऱ्याचे नाव
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून दररोज पाच ते सात जणांचा मृत्यू होण्याची साखळी कायम राहिली आहे. सोमवारी ससूनसह खासगी रुग्णालयात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या १२१ पर्यंत पोहोचली आहे तर पुणे शहर जिल्ह्यात ७१ रुग्णांची वाढ झाली असून एकूण रुग्णसंख्या २१२२ झाली आहे. तर ५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
नांदेड : कोरोनाबाधित आढळलेले चार पॉझिटिव्ह रुग्ण फरार, दोन तारखेपासून आहेत गायब, अन्नछत्रातील 20 जण पॉझिटिव्ह आल्यानंतर 16 जणांचा शोध घेऊन उपचार सुरु, पण त्यातील चार फरार जणांविरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मालेगाव हॉटस्पॉट
कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव येथील एका बाधित रुग्णाचा दुसऱ्यांदा पाठवलेला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अजूनही या व्यक्तीला संसर्ग कायम असून त्यांना पुढील काही दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागणार आहेत. हा रुग्ण ७० वर्षे वयाचा असून मालेगावातील नयापुरा भागातील रहिवासी आहे. मंगळवारी सकाळी मालेगावातील १४ संशयित रुग्णांची अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये १३ जणांचे अहवाल निगेटिव आले असून या बाधित रुग्णाचा अहवाल मात्र पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे.
पालघर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १८० वर पोचली असून त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८४ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २८०६ कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून ३२२ अहवाल प्रतीक्षेत आहेत. यामध्ये वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रात १५३ तर पालघर ग्रामीणमध्ये २७ रुग्ण पॉझिटिव्ह नोंदवले गेले आहेत. सध्या पालघर ग्रामीणमधील १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नाशिक जिल्ह्यातील रुग्ण संख्या ३८२
नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३८२ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण मधील २०, नाशिक शहरातील १८, माळेगावातील ३३८ आणि नाशिक बाहेरील सहा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला असून २५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
हिंगोलीत जवानांना वाढता संसर्ग
हिंगोलीमध्ये गेल्या २४ तासांत ३७ रुग्णांची वाढ झाली आहे. पुन्हा १४ एस.आर.पी.एफ जवानांचा तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ८९ वर पोहोचली आहे.
मालेगाव आणि मुंबईत बंदोबस्ताला गेलेल्या हिंगोलीतील जवानांचे टप्प्याटप्प्याने अहवाल येत आहेत. हे सर्व जवान मुंबई आणि मालेगावच्या हॉटस्पॉटमध्ये बंदोबस्तांवर होते. त्यातील १९४ पैकी हिंगोलीच्या ४६ तर जालन्याच्या एका अशा ४७ जवानांना करोनाची लागण झाली होती. आज नव्याने प्राप्त झालेल्या अहवालानुसार १९४ जवानांपैकी २२ जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण बाधित जवानांपैकी ३४ जवान मालेगाव तर ३५ जवान मुंबई येथून कर्तव्य बजावून आले होते. तर उपचार करणाऱ्या परिचारिकेला प्राथमिक लक्षणे आढळून आल्यानंतर तिचे स्वब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. अहवाल आल्यानंतर तिलाही करोनाची लागण झाल्याचं आढळून आले आहे. विशेष बाब म्हणजे सुरुवातीस बाधित आढळलेल्या जवानांचा १४ दिवसानंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पूर्वी एका रुग्णाने करोनावर मात केल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४ जवानांना मधूमेह व उच्चरक्तदाब असल्याने त्यांना औरंगाबादला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
देशभरात ४६ हजार रुग्ण
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी देशव्यापी लॉकाडऊन जाहीर करण्यात आला. मे महिन्यातही लॉकडाऊन सुरूच आहे. दुसरीकडे, आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आत्तापर्यंत ४६,४३३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील जवळपास १२,७२७ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय तर १५६८ जणांचा यात बळी गेला आहे. गेल्या २४ तासांत जवळपास ३९०० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले तर १९५ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय. सध्या ३२,१३८ जणांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, गोवा, लडाख, मणिपूर, मिझोरम, पुदुच्चेरी, त्रिपुरा, उत्तराखंड या राज्य / केंद्रशासित प्रदेशांत करोनामुळे अद्याप एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, हे विशेष.