#CoronaEffect : अमिताभ म्हणतात “कुछ दिन तो गुजारिये गुजरात मे ….” तर कामगार म्हणतात , “आम्हाला कुत्र्यासारखे मारले , आता गुजरातचे नवच नको…”
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घोषित केलेला लॉक डाऊन तिसऱ्या टप्प्यात गेल्यानंतर विविध राज्यात अडकलेल्या लोकांना आपापल्या राज्यात घरी जाण्यासाठी केंद्र शासनाने विशेष रेल्वे सोडल्याच्या वल्गना केल्या असल्या तरी नियोजनशून्य कारभारामुळे या घोषणेचे चांगलेच तीन तेरा वाजले असून देशभर या विषयावरून परप्रांतीय मजूर आणि पोलीस , प्रशासन यांच्यात मोठा संघर्ष होत आहे. दरम्यान यामुळे पुन्हा एकदा कामगारांच्या घरी जाण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना केंद्र शासनाने मात्र मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका घेतली असल्याचे चित्र आहे. या विषयावरून
गुजरातच्या सुरत येथे प्रशासनाच्या विरोधात परप्रांतीय मजुरांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता या आंदोलनाला हिंसक वळण लागले तेंव्हा या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत अश्रुधुराच्या नळकांड्या कडून लाठीचार्ज करून सुमारे २०० लोकांना अटक केली . या शिवाय मुंबई आणि बंगलोर मध्येही पोलीस आणि परप्रांतीय कामगार त्यांच्यात संघर्ष होत असल्याचे वृत्त आहे. या कामगारांच्या संदर्भात केंद्र सरकारने ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असताना विशेष रेल्वे सोडल्याची घोषणा करून त्यात प्रवास खर्चाचा ८५ टक्के आणि १५ टक्के असा भेद केल्यामुळे पुन्हा प्रश्न निर्माण झाला यावरून विरोधी पक्ष आणि मोदी सरकार यांच्यात जुगलबंदी चालू आहे. तरीही सरकारकडून मात्र कुणीही अधिकृतपणे बोलायला तयार होत नाही.
गुजरात मधून कसे बसे वाराणसी येथे आपल्या घरी पोहोचलेल्या टेक्स्टाईल कामगारांनी गुजरातमध्ये पोलिसांनी कामगारांना कशी अमानुष वागणूक दिली हे सांगितले . नवभारत टाईम्स शी बोलताना हे कामगार म्हणाले कि , आम्हाला कुत्र्याप्रमाणे गुजरात मधल्या दाहोद मधून पळवण्यात आले . घरी जाण्यासाठी आम्ही खिशातले सर्व पैसे खर्च केले परंतु तरीही आमचा छळ करण्यात आला. त्यांना आम्ही सांगितले कि , आम्हाला आमच्या घरी जायचं आहे . हा जणू काही आमचा गुन्हा आहे असे समजून गुजरातमध्ये आम्हला दहशतवाद्यांसारखी वागणूक मिळाली. याबद्दल अनेक कामगारांनी केवळ खंतच व्यक्त केली नाही तर पुन्हा आम्ही गुजरातमध्ये पाऊलही ठेवणार नाही अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः गुजरातचे फाईंड आहेत आणि वाराणसीचे खासदार आहेत त्यामुळे वाराणसी येथील अनेक टेक्सटाईल कामगार गुजरातच्या अनेक शहरात कामावर आहेत. गुजरात राज्याबद्दल बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मोदी-शहांच्या गुजरातची तारीफ करताना एका जाहहरातीत म्हणतात ” कुछ दिन तो गुजारिये गुजरात मे ….” त्यावर आलेला अनुभव लक्षात घेता वाराणसी मधील कामगारांची भावना अत्यंत बोलकी आहे.
सध्या राज्य प्रशासनासमोर वेगळाच प्रश्न निर्माण झाला असून पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि बिहार या राज्य सरकारांनी आपले मजूर परत आपल्या राज्यात घेण्यास नकार दिला राज्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे परराज्यातील बहुतेक मजूर उत्तर प्रदेश बिहार मध्यप्रदेश गुजरात झारखंड आणि पश्चिम बंगालमधील आहे २३ मार्चला देशात लॉक डाऊन लागू झाल्यानंतर अनेक राज्यात हे कामगार अडकले असून त्यांची कामे बंद झाल्यामुळे त्यांना आहे त्या शहरात राहणे अवघड झाले आहे. याशिवाय ज्या राज्यात असे कामगार मोठ्या प्रमाणात आहेत त्या राज्य सरकारवर अशा कामगारांच्या सुरक्षिततेचा आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.