Aurangabad पोलिसांची अशीही माणुसकी : नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे कौटुंबिक कलह, पोलिसांच्या मध्यस्थीने कुटुंबाचे पुनर्वसन
नातेवाईकांनी संसार उध्दवस्त करण्याच्या हेतूने त्यांच्या संसारात ढवळाढवळ करुन कलह वाढविला. त्यामुळे दाम्पत्याच्या सुखी संसारात ठिणगी पडली. दारुडा पती नेहमी छोटछोट्या कारणावरुन पत्नीला मारहाण व शिवीगाळ करु लागला. त्याचा विपरीत परिणाम तिन्ही मुलांवर होऊ लागला. या त्रासाला कंटाळलेल्या विवाहितेने शेवटी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तिच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पतीची समजूत काढली. एवढेच नाही तर दोघांना भाडेतत्त्वावर खोली घेऊन देत त्यांना रोजगार देखील उपलब्ध करुन दिला.
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने दर शनिवारी तक्रार निवारण दिन म्हणून नागरिकांच्या तक्रारींचे कायदेशीर निवारण केले जाते. जुलैपासून आतापर्यंत अडीच हजार तक्रारींचे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने निरसण करण्यात आले आहे. १३ डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे एका महिलेने दारुड्या पतीसह नातेवाईकांनी तीन मुलांसह घराबाहेर हाकलून दिल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने अधीक्षक पाटील यांनी देवगाव रंगारी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय अहिरे यांना दाम्पत्याचे समुपदेशन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, शनिवारी ही तक्रार निवारण दिनानिमित्त सहायक पोलिस निरीक्षक अहिरे यांनी दाम्पत्याला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. यावेळी दोघांचे म्हणणे ऐकल्यानंतर पतीला नातेवाईकांनी संसारात हस्तक्षेप केल्यामुळे दोघांमध्ये भांडण व्हायचे याची जाणीव करुन दिली. त्यांच्यातील वाद गैरसमजूतीमधून झाला होता हे देखील समोर आणले. त्यामुळे दोघांमधील वाद जागेवरच मिटविण्यात पोलिसांना यश आले. यानंतर दाम्पत्याला भाडेतत्त्वावर पोलिसांनी खोली घेऊन दिली. याशिवाय पती गवंडी काम करत असल्याने त्याला पोलिस ठाण्याच्या कंपाऊंडचे व रोजंदारीचे कामही देण्यात आले. तर त्याची पत्नी शिवणकाम करत असल्याने तिला देखील टेलर दुकान तसेच टेलरिंगचे घरकाम देण्यात आले.
पोलिसांच्या मध्यस्थीमुळे आज या दाम्पत्याला संसार उध्दवस्त होता होता वाचला.