Air Strike : जैशच्या तळांवर ३०० मोबाइल सुरू होते ! : NTRO
बालाकोट येथे हवाई दलाच्या बॉम्ब हल्ल्यात खरंच दहशतवादी मारले गेलेत का? असा प्रश्न राजकीय पातळीवरून उपस्थित करण्यात येत आहे . दरम्यान यामुळे हवाई दलाच्या कारवाईशी संबंधित माहिती हळूहळू आता समोर येत आहे. ‘द नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन’ (NTRO) ने दिलेल्या माहितीनुसार , जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई दलाच्या बॉम्ब हल्ल्याच्या आधी जवळपास ३०० मोबाइल फोन सुरू होते. भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले. हवाई दलाला हल्ल्याची मंजुरी मिळाल्यानंतर NTRO ने सर्व्हिलन्स सुरू केले. यादरम्यान NTROला ३०० मोबाइल फोन सुरू असल्याचं लक्षात आलं. तसंच भारताच्या इतर गुप्तचर संस्थांनीही एवढेच दशतवादी असल्याचं सांगितलं. यानंतर याच ठिकाणांवर हवाई दलाने बॉम्ब हल्ला केला. यावेळी भारताच्या इतर गुप्तचर यंत्रणा NTROच्या संपर्कात होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. एएनआयने हे वृत्त दिले आहे. २६ फेब्रुवारीच्या पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मिराज २००० या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये बॉम्ब हल्ला केला. पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या बसवर आत्मघाती हल्ला करण्यात आला. यात ४० जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या तळांवर हवाई दलाने हा बॉम्ब हल्ला केला होता. यानंतर जैशच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा भारताने केला. पण या हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. यामुळे हवाई दलाच्या कारवाईत खरंच दहशतवादी ठार झाले का ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.