मुंबईहून गावात आलेल्या ट्रक चालकाला होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देणे पडले महागात, वडील आणि पुतण्याचा गेला बळी …
गावात सामाजिक सुधारणा आणि लोकांमध्ये आरोग्य जागृती करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यावर आपले वडील आणि पुतण्याला गमावण्याची वेळ आली आहे. लातूर जिल्ह्यात मुंबईहून ट्रक घेऊन गावाकडे आलेल्या एका व्यक्तीला होम क्वारंटाईन व्हावं लागेल असा सल्ला दिल्याने त्याचा राग येऊन संतापलेल्या ट्रकचालकाने सल्ला देणाऱ्याच्या अंगणात झोपलेल्या पाच जणांवर लोखंडी रॉडनं हल्ला केला. या हल्ल्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
त्याचे असे झाले कि , कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून गावात ट्रक घेऊन आलेल्या ट्रक चालकाला गावात गाडी का लावली, असा जाब विचारल्यामुळे निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे रविवारी पहाटे हे हत्याकांड घडल्याचे वृत्त आहे. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी फरार असून त्याचा शोध घेत आहेत. नेहमी मुंबईला राहणारा व नुकताच गुजरातहून ट्रक घेऊन निलंगा तालुक्यातल्या बोलेगाव येथे आलेल्या एका व्यक्तीला होम क्वारंटाईन व्हावे लागेल, असा सल्लादिल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला. या रागातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे . विद्यमान बरमदे असं आरोपीचं नाव आहे. आरोपी नेहमी मुंबईला वास्तव्याला असतो. तो ट्रॅक घेऊन गुजरातहून आला अशी माहिती कळल्याने बोळेगावातील (ता. निलंगा) कोणत्याही सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे शत्रुघ्न पाटील यांनी विद्यमान बरमदे यास होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला. त्यावरुन बरमदे व पाटील यांच्यात वाद झाला आणि त्याचे पर्यावसान खुनी हल्ल्यात झाले.
शत्रुघन आतील यांच्याशी वाद झाल्यानंतर आरोपी बरमदे शेजारील चांदोरी गावात राहणाऱ्या आपल्या बहिणीच्या गावाकडे गेला आणि नंतर पहाटे सहा साथीदारांसह पुन्हा बोळेगावात आला आणि अंगणात झोपलेल्या पाच जणांवर त्यांनी लोखंडी रॉडनं हल्ला केला. त्यात फिर्यादी शत्रूघ्न पाटील यांचे वडील शहाजी पाटील व त्यांचा पुतण्या वैभव पाटील जागेवर ठार झाले. तर शत्रुघ्न पाटील यांच्यासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत बरमदे यासह सहाजण आरोपी असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कासारशिरसी पोलिसांत सुरु आहे. आरोपी सध्या फरार आहेत.