Maharashtra Rain Alert : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; 28 जिल्ह्यांना यलो अलर्ट, कोकणासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा
जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील 28 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचे वारे आणि काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे.
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मुसळधार पावसासह ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाची हजेरी
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर तसेच घाटमाथा परिसरात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रतितास राहू शकतो.
मराठवाड्यात पुढील 72 तास महत्त्वाचे
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी पुढील 72 तासांचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा जोर
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतही पावसाची शक्यता वाढली आहे. विशेषतः नाशिकच्या घाटमाथा भागात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर आणि चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून हलका ते मध्यम पाऊस, तर काही भागांत जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
खरीप पिकांना दिलासा
जून महिन्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अनेक भागांतील शेतकरी चिंतेत होते. मात्र आता पावसाचा जोर वाढल्याने खरीप हंगामातील पेरणीनंतरच्या पिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला
हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिल्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबू नये तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनीही हवामान विभाग आणि कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
इराणवर अमेरिकेचा सलग दुसऱ्या दिवशी हवाई हल्ला; ट्रम्प यांचा इशारा-इराणचे अस्तित्व धोक्यात
Maharashtra Rain Alert, IMD Yellow Alert, Maharashtra Weather Update, Monsoon Update, Heavy Rain Maharashtra
