MaharashtraNewsUpdate : समुद्र किनारी असलेल्या पाच शहरांबाबत सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : केरळच्या धर्तीवर राज्याच्या समुद्रकिनारी असणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत बांधण्याचा निर्धार राज्यसरकारने केला असून राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये जवळपास १७१ किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. त्यासाठी जवळपास एक हजार सहाशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या पाचही जिल्ह्यातील माहिती घेण्यात आली असून येत्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात समुद्रकिनारा लाभलेल्या जिल्ह्यांपैकी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये ही संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. संपूर्ण किनारपट्टीला संरक्षण भिंत बांधणं शक्य नाही. त्यामुळे ज्या गावांना समुद्राचा धोका आहे. पावसाळ्यात अथवा भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी गावात आणि वाड्या-वस्त्यांमध्ये येऊ नये. यासाठी ही संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. शेतजमिनीत समुद्राचं पाणी आल्यानंतर शेतजमीनिवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे.
या पाच जिल्ह्यात भिंत उभारण्याचा प्रस्ताव आणि त्यासाठीची तरतूद
ठाणे : ठाणे जिल्ह्यासाठी २.५० किलोमीटरची भिंत बांधावी लागेल त्यासाठी ५० कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च आहे
पालघर : पालघर जिल्ह्यात ७.३१ किलोमीटर भिंत बांधावी लागेल. त्यासाठी १०३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
रायगड : रायगड जिल्ह्यात २२.९७ किलोमीटरची संरक्षण भिंत बांधावी लागेल त्यासाठी ३४९ कोटी खर्च अपेक्षित आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६० किलोमीटर ची भिंत बांधावी लागेल. त्यासाठी ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ७८.२५ किलोमीटर भिंत बांधावी लागेल. त्यासाठी ६९४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.