MaharashtraRainUpdate : घरांवर दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू

महाड : महाडमध्ये तळई गावातील तब्बल ३५ घरांवर दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे बचावपथक दाखल झाले असून बचाव आणि शोधमोहिम मोठ्या वेगाने सुरू आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांकडून आणि प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे.
दरम्यान गेल्या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. चक्क १० ते १५ फूट रस्त्यांवर आणि वस्त्यांत पाणी शिरले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीला ढगफूटी सदृश्य अतीमुसळधार पावसाने, महापूर परीस्थिती निर्माण केलीय. सावित्री नदीला आलेल्या महापूरामुळे महाड शहर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.
पोलादपूर तालुक्यात दरड कोसळून चौघांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथेही दरड कोसळून आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजून ५ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तर ४ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या गावांना जोडणारे पितळवाडी- उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेल्यामुळे मदत यंत्रणा पोहोचू शकत नाही.
चिपळूणमध्ये 8 कोविड रुग्णांचा मृत्यू
रत्नागिरीत आलेल्या महापुराचा फटका कोविड रुग्णालयाला बसला असून तब्बल ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या कोविड रुग्णालयाला चहूबाजुंनी पाण्याने वेढल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिपळूणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चिपळूणच्या अपरांत कोविड सेंटरलाही चहूबाजुंनी पाण्याने वेढलं आहे. याच कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तब्बल ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.