MaharashtraNewsUpdate : अशा “अजब” प्रेमापोटी “त्यांनी” केली आत्महत्या !!

file photo
मुंबई : मुंबईच्या नालासोपारा परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे आपला आवडता कुत्रा मेल्यामुळे या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर या आत्महत्येमागे आणखी काही कारणे आहेत का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपाऱ्यातील गणेशनगर भागात हि घटना घडली आहे. विजय कदम (५४ ) आणि जयश्री कदम (५०) अशी या पती -पत्नीचे नाव आहे. विजय कदम हे मुंबईतील एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. तर जयश्री या गृहिणी होत्या. त्यांना कोणतेही आपत्य नव्हते , त्यामुळे त्यांनी घरात एक कुत्रा पाळला होता. पण अलीकडेच या कुत्र्याचे निधन झाले . मृत दाम्पत्याला कुत्र्याच्या निधनाचा जबरदस्त मानसिक धक्का बसला. विरह सहन न झाल्यानं शेवटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी या दाम्पत्याला कोरोना विषाणूची लागण झाली होती. कोविड सेंटरमध्ये काही दिवस उपचार घेतल्यानंतर दोन्ही दाम्पत्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. ते दोघंही ठणठणीत बरे होऊन घरी परतले. पण दरम्यानच्या काळात त्यांच्या कुत्र्याचं निधन झालं. श्वानाच्या निधनाचा त्यांच्या दोघांवर जबरदस्त मानसिक आघात झाला होता. यामुळे मागील काही दिवसांपासून दोघंही नैराश्यात गेले होते. यातूनच त्यांनी सोमवारी दुपारी घराच्या छताला गळफास लावून जीवनयात्रा संपवली आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक तपास केला.
दरम्यान संबंधित दाम्पत्य मागील काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती शेजारच्यांनी दिली आहे. कुत्र्याच्या निधनानंतर त्यांची ही स्थिती झाल्याचंही शेजारच्यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर तपासाची दिशा ठरवली जाईल अशी माहिती तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.