CoronaMaharashtraUpdate : डेल्टा प्लस व्हेरिएंट मुळे राज्यात पुन्हा नवे निर्बंध , जाणून घ्या काय आहेत नियम ?

सर्वच जिल्हे तिसऱ्या गटात । दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहार राहतील सुरु । शनिवार रविवार लोकडाऊन
मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने आज नवीन शासन आदेश काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कडक निर्बंध लावण्याच्या निर्णयाला सर्वानुमते संमती देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत.
राज्य शासनाने आपल्या नवीन आदेशात म्हटले आहे की, आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती बदलता तिसऱ्या स्तरावरील निर्बंध महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत. तिसऱ्या स्तरावरील निर्बंध आणखी कडक करायचे असल्यास स्थानिक प्रशासन त्याबाबत निर्णय घेऊ शकते . लेव्हल ३ मध्ये अत्यावश्यक दुकाने आणि आस्थापना सर्व दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तर अत्यावश्यक नसलेली दुकाने आणि आस्थापनं सोमवार ते शुक्रवार या दिवसांत ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील.
Levels of restrictions for safe Maharashtra pic.twitter.com/FOAKTSrI9A
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 25, 2021
असे आहेत निर्बंध
महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव झाल्यामुळे राज्य सरकारने अधिक खबरदारी घेतली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे राज्यात २१ रुग्ण आढळले यातील एका ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे निर्बंध लागू केले आहेत. तिसऱ्या स्तरावरील निर्बंधात रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. विकेंड दिवशी हॉटेल सुरू राहणार नाहीत. त्यावेळी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल. त्याचसोबत आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल.
जीम, सलून आणि स्पा दुकानं ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. राज्यात गुरुवारी कोविड १९ चे १० हजाराहून अधिक रुग्ण आढळले. डेल्टा प्लसचे २१ रुग्ण असून त्यातील एक दगावला. मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी, ठाणे याठिकाणी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. कोविड-19 चा प्रसार होणार नाही याची काळजी घेत नागरीकांना बंधने सुकर होणे सुनिश्चित करण्याबरोबरच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी खालील विशेष कृती करू शकतील.