MaharashtraNewsUpdate : राज्याच्या आरोग्य विभागात १६ हजार पदांची भरती

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. अशा 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. दरम्यान सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा ही समस्या देखील आहे. त्यामुळे ऑक्सिजन आणि लसींच्या पुरवठ्याबाबतही केंद्राशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागातील 16 हजार पदे तातडीने भरली जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. या 16 हजार पदांमध्ये क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची भरती केली जाणार आहे. तर अ आणि ब वर्गातील प्रत्येकी 2 हजार अशी 4 हजार पदे भरली जाणार असल्याचे सांगताना ते म्हणाले कि , ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करण्यात येणार आहे.
दुसरा डोस देण्यात अडचणी
लसीकरणाच्या मुद्द्यावरून टोपे यांनी पुन्हा एकदा केंद्राकडून लसींचा पुरवठा होत नसल्याचे म्हटले आहे. केंद्राकडून कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात अडचणी असल्याचे टोपे म्हणाले. 45 वर्षावरील ज्या नागरीकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यासाठी लस योग्य प्रमाणात उपलब्ध नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळं राज्यात 45 वरील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळत नसल्याची तक्रार करताहेत. त्यामुळे राज्य सरकार याबाबत धोरणामात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे, असेही टोपे म्हणाले. 18 ते 44 वयोगटासाठी राज्य सरकारने खरेदी केलेले कोव्हॅक्सिन 45 वरील वयोगटातील नागरिकांसाठी देण्याचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे. केंद्राने जास्तीच्या कोव्हॅक्सिन (भारत बायोटेक) लस द्याव्या अशी मागणी राज्य केंद्राकडे करणार आहे.
ऑक्सिजनची अडचण
दरम्यान कर्नाटकवरून येणारा ऑक्सिजन थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे अडचणी येणार असल्याचे टोपे म्हणाले. राज्याच्या वाट्याचा येणारा ऑक्सिजन थांबवणे योग्य नाही. याबाबत वरिष्ठ स्तरावर आम्ही बोलत आहोत तसेच मुख्यमंत्री केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोलणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. राज्यात रोज 1750 मेट्रीक टन ऑक्सीजनची गरज आहे. त्यामुळे कर्नाटकहून येणारा ऑक्सिजन थांबवल्यास अडचण येणार असल्याचेही टोपे म्हणाले.