राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत , मुख्यमंत्री उद्या बोलणार

राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत पुन्हा कडक लॉकडाऊनबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पूर्ण लॉकडाऊन लावला जात असल्याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. राज्यात सध्या बेड बरोबरच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण नझाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन लावावाच लागेल लवकरच त्यासंबंधी गाईडलाइन जारी करण्यात येतील, असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. तसेच, उद्या रात्री आठनंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान राज्यात बुधवारी रात्री आठपासून संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा, अशी विनंती सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. आता लॉकडाऊनसंदर्भातील शेवटचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
राज्यातील लॉकडाऊन हा १५ दिवसांचा असेल. तसेच, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद न करण्याच्या सूचनाही या बैठकीत दिल्या आहेत. मात्र, जिल्हाबंदी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काही तासांतच कठोर लॉकडाऊनच्या गाईडलाइन जारी होतील तसेच, मुंबई लोकलबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्या जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणे दहावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला असून देशातील सात राज्यांमध्ये परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सीबीएसई आणि आयसीएसईच्या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणं महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. बारावीच्या परीक्षा होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली