AurangabadNewsUpdate : मयत कोरोना बधिताचे नातेवाईक झाले पसार… !!

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात एका रुग्णाचा मृतदेह ४ दिवसांपासून शवागृहातच पडून आहे. कारण अंत्यसंस्कार आणि त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने घाटी प्रशासन आणि पोलिसांसमोर या रुग्णांच्या नातेवाईकांना शोधण्याचे आव्हान आव्हान निर्माण झाले आहे.
विजय पांडुरंग मोरे (५२, रा. ढाकेफळ, ता. पैठण) असे मृत रुग्णाचे नाव आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे ८ एप्रिल रोजी ते घाटीत भरती झाले होते. उपचार सुरू असताना १३ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर घाटीतील समाजसेवा अधीक्षकांनी रुग्ण दाखल होताना दिलेल्या दोन्ही मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला; परंतु एक मोबाईल नंबर बंद होता तर दुसऱ्या नंबरवर संपर्क झाला. मात्र नातेवाईक असल्यासंदर्भात स्पष्टता झाली नाही. त्यामुळे १३ एप्रिलपासून विजय मोरे यांचा मृतदेह घाटीतील शवागृहातच आहे. नातेवाईकांशिवाय अंत्यविधी करण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे; परंतु हद्दीच्या प्रश्नात ही प्रक्रियाही अडकली आहे. उपचारासाठी नोंदविण्यात आलेले नाव बरोबर आहे की नाही, यावरही शंका उपस्थित होत आहे.
दरम्यान ढाकेफळ येथून रुग्ण रेफर झाला होता. दिलेल्या पत्त्यानुसार गावात विचारणा करण्यात आली; परंतु पोलीस पाटील यांनी असे कोणी नाही, असे सांगितले. दिलेल्या दोन मोबाईल नंबरपैकी एक बंद आहे, तर दुसरा राँग नंबर असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली असल्याची माहिती घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे यांनी दिली आहे.