२२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा शहरातील शाळा बंद

औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांच्या संखेत पुन्हा वाढ होत असून, परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी २२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत शहरातील इयत्ता ५ वी ते ९ वी आणि ११ वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यांचे वर्ग पुर्वीप्रमाणेच ऑनलाईनपद्धतीने सुरु राहतील. परंतु १० वी, १२ वीच्या बोर्ड परिक्षा असल्याने या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास मुभा दिली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांड्ये यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच गेल्या दोन आठवड्यापासून शहरातही कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. हा नवा स्ट्रेन असल्याचेही आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरात पुन्हा पुर्वीसारखा उद्रेक होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रशासक पांड्ये म्हणाले, शहरातील मंगल कार्यालये, मॉल्स, बाजार, भाजीमंडई, व्यापारपेठा आणि पंचतारांकीत हॉटेल्स या सर्वांना गर्दी करू नये, याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यासोबत येथील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका आणि पोलिस विभागांचे पथक नियुक्त केले आहेत. शहरात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने इयत्ता ५ ते १२ वी पर्यंतच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने व काही शाळांमध्ये कोरोना रुग्ण अढळल्याने कोरोनाची बाधा विद्यार्थ्यांना होऊ नये, शाळांमधून कोरोनाचा प्रसार अधिकप्रमाणात होऊ नये म्हणून इयत्ता ५ वी ते ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यातून शहरातील १० वी आणि १२ वीचे वर्ग वगळण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांनी शाळेत न येता पुर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग करावेत, असेही प्रशासक पांड्ये यांनी सांगितले. त्याबाबत सर्व शाळांना सूचना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ही बंदी २२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे.