Corona Virus Effect : राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १७ , मुख्यमंत्र्यांनी घेतले हे महत्वपूर्ण निर्णय , या ६ शहरात आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात करोनाचे १७ रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जीम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. तसेच नागरिकांनी रेल्वे, बसचा प्रवास विनाकारण करू नये, मॉलमध्येही जाणं टाळावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
राज्यात करोनाचे एकूण १७ रुग्ण आढळले असून यामध्ये सर्वाधिक पुण्यात १०, मुंबईत तीन , नागपूरमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. मात्र, या १७ रुग्णांमधील करोनाची लक्षणं गंभीर नसून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जिम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. करोनाचा राज्यात फैलाव नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. पुढचे १४ दिवस काळजी घ्यायला हवी , म्हणून हा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान रेल्वे आणि बसेस या अत्यावश्यक सेवा आहेत. त्यामुळे त्या बंद करता येणार नाही. कोणतीही सार्वजनिक वाहतूक अशी बंद करता येणार नाही. मात्र, नागरिकांनी विनाकारण प्रवास करू नये. गरज असेल तरच प्रवास करा, असे सांगतानाच मॉलमध्ये जाणेही नागरिकांनी तूर्त टाळावे , असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबई पुण्यातील कुठलेही हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉल बंद करण्यात आलेलं नाही. मात्र, लोकांनी या ठिकाणी जाणं टाळावं, असं सांगतानाच आम्हाला व्यवसायापेक्षा जनतेच्या जिवीताची काळजी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर सध्या लग्न सराईचे दिवस आहे. मात्र नागरिकांनी लग्न समारंभामध्येही काळजी घ्यावी. गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं ते म्हणाले.
दरम्यान खासगी कंपन्यांनाही आवाहन करताना ते म्हणाले कि , खासगी कंपन्यांनी जिथे जिथे शक्य आहे, तिथे कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा द्यावी, तसेच क्रिडा, सभा, मेळावे, समारंभ आदी गर्दीचे कार्यक्रम घेण्यात येऊ नये. या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांना संबंधित शासनाकडून परवानगी देण्यात येणार नाही. ज्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या परवानग्या रद्द करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्यातील परिस्थितीची अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले कि , चीन, फ्रान्स, जर्मनी, दक्षिण कोरिया, इटली, स्पेन आणइ इराण या सात देशांना केंद्र सरकारने करोनाबाधित जाहीर केलं होतं. पण आपल्याला सापडेलेले १७ रुग्ण हे या सात देशांतून आलेले नाहीत. तर अमेरिका आणि दुबईतून आलेल्या या रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे करोना बाधित देशांच्या यादीत अमेरिका आणि दुबईचा समावेश करण्याची केंद्र सरकारला सूचना करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच १५ फेब्रुवारीनंतर या सात देशांना भेटी देणाऱ्या आणि आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत मायदेशात येणाऱ्या लोकांना विलगीकरण कक्षात न ठेवता अलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून शासकीय महाविद्यालये आणि सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात कुठेही शट-डाऊन करण्याची गरज नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि गर्दी करू नये, असं आवाहन करतानाच उंबरठ्यावरच संकट उंबरठ्यावरच परतवून लावू, असंही ते म्हणाले.