कोंढवा संरक्षण भिंत दुर्घटना.. बिल्डर अग्रवाल बंधूंना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंपजवळ असलेल्या बहुमजली अॅल्कॉन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांच्या मृत्यू प्रकरणी विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल या बिल्डर बंधूंना शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आली होती. कोर्टाने दोघांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी प्रकरणी या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बिल्डर जगदीशप्रसाद तिलकचंद अगरवाल (वय-६४) यांनी पुण्यातील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांची जबाबदारी स्विकारली आहे. दरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या १५ कामगारांचे मृतदेह पहाटे एअरफोर्सच्या विमानाने दिल्ली आणि पाटण्याला रवाना करण्यात आले.
विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल या दोघांना आज कोर्टात हजर करण्यात आले. सन २०१३ मध्ये बांधलेल्या संरक्षण भिंतीच्या दुरूस्तीसाठी वारंवार बिल्डरला पत्र देऊन दुरूस्तीची मागणी करण्यात आली होती. मात्र, बिल्डरनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे १५ कामगारांचा निष्पाप जीव गेला. बिल्डरने सोसायटी हॅंडओव्हर केलेली नसल्याने संरक्षण भिंतीच्या दुरूस्तीची जबाबदारी ही बिल्डरची आहे. असा आरोप अगरवाल बिल्डरवर करण्यात आला आहे.
दरम्यान पुण्यातील भिंत पडण्याच्या घटनेमध्ये १५ कामगारांचा निष्पाप जीव गेला आहे. त्यामुळे या प्रकरणात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तसेच राज्य सरकारच्या अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज असून या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करा, अशी मागणी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केली आहे.
या दुर्घटनेतील मृत्यूला बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत, असा आरोप होत आहे. या प्रकरणी अॅल्कॉन लॅंडमार्कस रजिस्टर संस्थेचे भागीदार बिल्डर जगदिशप्रसाद तिलकचंद अगरवाल (वय-६४), सचिन जगदिशप्रसाद अगरवाल (वय-३४), राजेश जगदिशप्रसाद अगरवाल (वय-२७), विवेक सुनील अगरवाल (वय-२१), विपुल सुनील अगरवाल (वय-२१) तसेच कांचन रजिस्टर संस्थेचे भागीदार बिल्डर पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी यांच्यासह साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, लेबर कॉन्ट्रक्टर विरोधात कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संरक्षक भिंत कमकुवत, बेकायदेशीर होती. मजुरांच्या सुरक्षित निवाऱ्याची काळजी न घेणारे बिल्डर आणि निष्क्रिय पालिका अधिकारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.