भ्रष्टाचार म्हणजे फक्त पैसे खाणं नाही’; अभिनेता अतुल कुलकर्णींची पोस्ट चर्चेत, सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. सर्वसामान्य नागरिक नियमांचे पालन करत असताना काही सत्ताधारी आणि राजकीय व्यक्ती नियमांचे उल्लंघन करतात, असा मुद्दा उपस्थित करत त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
‘भ्रष्टाचार म्हणजे फक्त पैसे खाणं नव्हे’
अतुल कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये भ्रष्टाचाराची वेगळी व्याख्या मांडत लिहिले की, “भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार. म्हणजे फक्त पैसे खाणं म्हणजेच भ्रष्टाचार नव्हे. भ्रष्ट बोलणं, भ्रष्ट वागणं हे देखील भ्रष्टाचारच आहे.”
वेगमर्यादा पाळणाऱ्या नागरिकांना सायरनच्या धमक्या
कुलकर्णी यांनी नुकत्याच घडलेल्या एका अनुभवाचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, मिसिंग लिंकच्या मोठ्या बोगद्यात ते आणि इतर नागरिक 80 किमी प्रतितास वेगमर्यादेचे पालन करत प्रवास करत होते. त्याचवेळी एका सत्ताधारी व्यक्तींच्या ताफ्यातील गाड्या सायरन वाजवत 110 ते 120 किमी प्रतितास वेगाने पुढे गेल्या. त्या व्यक्ती नेमक्या कोण होत्या हे माहिती नसले, तरी नियम सर्वांसाठी समान असायला हवेत, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला.
राजकारण्यांच्या भाषेवरही साधला निशाणा
पोस्टमध्ये त्यांनी अलीकडील राजकीय वक्तव्यांचाही उल्लेख करत अनेक राजकारणी सार्वजनिक जीवनात अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “भ्रष्ट बोलणं आणि भ्रष्ट वागणं हे देखील भ्रष्टाचारच आहे,” असे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
‘भावना दुखावल्या असतील तर क्षमा करा’
पोस्टच्या शेवटी त्यांनी उपरोधिक शैलीत लिहिले की, “माझ्या या वक्तव्यामुळे जर कुणा राजकारण्यांच्या भावना दुखावल्या असतील तर (च) मला क्षमा करा.” त्यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तर काहींनी त्यावर टीकाही केली आहे.
धक्कादायक! दारूच्या नशेत बाईकवरून 4 महिन्यांचे बाळ पडले; आई-वडिलांना 400 मीटरपर्यंत समजलंच नाही
Atul Kulkarni, Atul Kulkarni Facebook Post, Corruption, Maharashtra Politics, Viral Facebook Post

