संतोष देशमुख हत्या प्रकरण सुनावणी; वाल्मिक कराडने नाकारले आरोप
बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 23 वी सुनावणी आज पार पडली. न्यायालयाने सर्व आरोप निश्चित करत गुन्ह्यांचा संपूर्ण घटनाक्रम वाचून दाखवला. मुख्य आरोपी वाल्मिक कराडने आरोप अमान्य केल्याचे स्पष्ट करत खटला लढण्याची भूमिका घेतली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आज (23 डिसेंबर) बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपींवर औपचारिकरित्या आरोप निश्चित केले. न्यायाधीशांनी आरोपींना गुन्ह्यांचा तपशील व घटनाक्रम वाचून दाखवत, “हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का?” असा थेट प्रश्न विचारला.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य आरोपी वाल्मिक कराडनी आरोप मान्य नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, या सुनावणीत वाल्मिक कराडने प्रथमच न्यायालयात स्वतःहून आपली भूमिका मांडत दोष नाकारला. यापूर्वी झालेल्या सुनावणीत आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता, तसेच हत्या प्रकरणातील व्हिडीओ आणि छायाचित्रे आरोपींच्या वकिलांना देण्यात आली होती.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले की, खंडणीला अडथळा ठरल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यांनी न्यायालयाकडे खटला जलदगतीने चालवण्याची मागणी केली असून, पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती, आणि हा खटला राज्यातील अत्यंत संवेदनशील प्रकरणांपैकी एक मानला जात आहे.

