Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BSPNewsUpdate : मायावती यांनी निवडला आपला उत्तराधिकारी , पुन्हा एकदा पुतण्याला बहाल केली जबाबदारी !!

Spread the love

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा सपाटून पराभव झाला. दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या आठवडाभरानंतरच पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी रविवारी (२३ जून) त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना त्यांचा एकमेव राजकीय वारसदार आणि पक्षाचा राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करीत पक्षातील नेत्यांना “त्याला पूर्वीपेक्षा अधिक आदर द्यावा ” असे आवाहन केले.

मायावतींनी २०१९ मध्ये आकाशची पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती केली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मायावती यांनी आकाश आनंद यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी आपला निर्णय बदलून आकाश आनंद यांना उत्तराधिकारी आणि पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले होते. येऊ घातलेल्या पोटनिवडणुका आणि २०२७ मध्ये होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन ही निवड केली जात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान “पक्ष आणि चळवळीच्या व्यापक हितासाठी ते परिपक्व नाहीत,” असे सांगत ७ मे रोजी, मायावतींनी आकाशला या जबाबदारीतून मुक्त केले होते. उत्तर प्रदेशच्या सीतापूरमधील पोलिसांनी आकाशवर द्वेष आणि शत्रुत्वाला प्रोत्साहन दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. त्यांनी भाजपा सरकारचा ‘आतंकवादीयो की सरकार (दहशतवाद्यांचे सरकार)’ असा उल्लेख केला होता. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला.

मायावतींच्या यूटर्नचे कारण काय?

“त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे बसपवर भाजपाची बी-टीम असल्याचा टॅग हटवण्यास मदत होईल. त्यामुळे जाटव आणि इतर दलित मतदारांचा विश्वास पुनर्संचयित करण्यात मदत होईल आणि लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर निराश झालेल्या आमच्या केडरला पुन्हा नवी ऊर्जा मिळेल,” असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. बसपकडे लोकप्रिय चेहरा नसल्यामुळे बसपला लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेत फटका बसला हे स्पष्ट आहे. मायावती या पक्षाचा एकमेव प्रमुख चेहरा राहिल्या आहेत. दरम्यान लालजी वर्मा, आर. के. चौधरी, राजा राम पाल, स्वामी प्रसाद मौर्य, नसीमुद्दीन सिद्दीकी, रामचल राजभर, इंद्रजीत सरोज आणि बाबूसिंह कुशवाह यांसारख्या दलित, ओबीसी आणि मुस्लीम नेत्यांनी एक तर आपली निष्ठा बदलली किंवा पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

राष्ट्रीय समन्वयक म्हणून २०१९ पासून आकाश आनंद यांचे पक्षातील अधिकार मर्यादित होते. त्यांना बाजूला करण्यात आले होते आणि लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपातही त्यांना फारसे महत्त्व दिले गेले नाही. २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बसपाच्या एका नेत्याने सांगितले की, पक्षाला एका तरुण नेत्याची गरज आहे जो राज्यभर फिरू शकेल, जिल्हावार बैठका घेऊ शकेल आणि थेट मैदानात उतरून काम करू शकेल.

बसपला २०२४ च्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. आझाद यांच्यासारख्या तरुण आणि लोकप्रिय दलित नेत्याच्या उदयाने उत्तर प्रदेशमध्ये बसपच्या मतांचा वाटा १९.३ टक्क्यांवरून ९.३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. आझाद यांनी सपा किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय नगीना मतदारसंघ १.५३ लाख मतांनी जिंकला आहे. सूत्रांनी सांगितले की, आनंद यांना पदावरून हटवण्यापूर्वी त्यांनी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली होती. पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी रोडमॅप तयार करण्याच्या कामाला आता गती मिळेल, असेही ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!